मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५९ वा सामना खास ठरला. कारण या सामन्यात आतापर्यंत पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या विजयामुळे चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई संघाच्या प्लेऑफपर्यंत पोहोचण्याच्या आशा मावळल्या आहेत. या सामन्यात मुंबईचा पाच गडी आणि पाच षटके एक चेंडू राखून विजय झाला असून चेन्नईचा पराभव झाला आहे. मुंबईसमोर विजयासाठी ९८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईने ही धावसंख्या पाच गडी राखून गाठली.
आजचा सामना म्हणजे चेन्नईसाठी करो या मरोची लाढाई होती. मात्र या सामन्यात चेन्नईने मुंबईसमोर फक्त ९८ धावांचे लक्ष्य ठेवले. परिणामी मुंबईने ही धावसंख्या पाच गडी राखून गाठली. सामन्याचा दुसरा डाव लवकर संपले अशी अपेक्षा असताना सलामीला आलेल्या इशान किशन (६) आणि रोहित शर्मा (१८) या जोडीने खराब कामगिरी केली. परिणामी सामना पंधरा षटकांपर्यंत लांबला. डॅनियल सॅम्स (१) आणि ट्रिस्टॅन स्टब्स (०) यांनीदेखील निराशा केली. मात्र मुंबईच्या तिलक वर्मा (४३) आणि टीम डेविड (१६) या जोडीने नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
याआधी चेन्नईकडून सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाड (७) आणि ड्वेन कॉन्वे (०) या जोडीने पुरती निराशा केली. तसेच दुसऱ्या विकेटसाठी आलेला मोईन अलीदेखील खातं खोलू शकला नाही. तर रॉबिन उथप्पादेखील फक्त एक धाव करुन पायचित झाला. ऋतुराज गायकवाड बाद होईपर्यंत चेन्नईच्या फक्त १७ धावा झाल्या.
त्यानंतर चौथ्या विकेटसाठी आलेल्या अंबाती रायडूने बचावात्मक पवित्रा घेत धावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र अवघ्या दहा धावा झालेल्या असताना तोही झेलबाद झाला. वरच्या फळीतील सर्वच फलंदाज दहा पेक्षा जास्त धावा करु न शकल्यामुळे चेन्नई संघाची चांगलीच दुर्दशा झाली. शेवटच्या फळीतील फलंदाजही मुंबईच्या गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत. शिवम दुबे(१०), ड्वेन ब्राव्हो (१२), समरजित सिंह (२) माहिश तिक्षाणा (०) यांनी अतिशय खराब फलंदाजी केली.
पाचव्या विकेटसाठी आलेल्या महेंद्रसिंह धोनीने मोठे फटके मारण्याचे टाळत मैदानावर टिकून राहण्याचा प्रयत्न केला. त्याने संधी मिळताच चौकार देखील लगावले. त्याने ३३ चेंडूंमध्ये ३६धावा करत चेन्नईचा धावफलक फिरता ठेवण्याचा प्रयत्न केला. तर दहाव्या विकेटसाठी आलेल्या मुकेश चौधरीने धोनीला देण्याचा प्रयत्न केला. मात्र सोळाव्या षटकादरम्यान तो धावबाद झाला. परिणामी चेन्नई संघ फक्त ९७ धावा करु शकला.
तर दुसरीकडे मुंबईच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांना पुरतं बांधून ठेवलं. डॅनियल सॅम्सने ऋतुराज गायकवाड, ड्वेन कॉन्वे आणि मोईन आली या आघाडीच्या फलंदाजांना तंबूत पाठवलं. तर रिले मेरेडिथने अंबाती रायडू आणि शिवम दुबे यांना बाद करुन मुंबईसाठी विजय सोपा केला. कुमार कार्तिकेयनेदेखील डिजे ब्राव्हो आणि सिमरजित सिंग यांना बाद करून चेन्नई संघ खिळखीळा केला. जसप्रित बुमराह आणि रमणदीप सिंग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. गोलंदाजांच्या या कामगिरीमुळे चेन्नईला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही.
Check Also
आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड
Spread the love नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …