Saturday , March 22 2025
Breaking News

अश्विनचा पंजा, टीम इंडियाचा धमाकेदार विजय, बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा

Spread the love

 

चेन्नई : टीम इंडियाने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचं आव्हान दिले होते. बांगलादेशचा डाव या विजयी आव्हानाच्या प्रत्युत्तरात 234 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून कॅप्टन नजमूल हुसैन शांतो याने सर्वाधिक 82 धावांची खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशच्या फलंदाजांना फार काही करता आले नाही. टीम इंडियाकडून लोकल बॉय आर अश्विन याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तर इतरांनी त्याला चांगली साथ देत बांगलादेशला गुंडाळण्यात योगदान दिले. टीम इंडियाने अशाप्रकारे 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

अश्विनने पहिल्या डावात बॅटिंगने धमाका करत कारकीर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले. त्यानंतर अश्विनला पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नाही. मात्र अश्विनने दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या. अश्विनची 5 विकेट्स घेण्याची ही 37 वी वेळ ठरली. अश्विनने यासह ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्न याच्या 37 वेळा 5 विकेट्स घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. अश्विनला त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

पहिल्या डावात टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. रोहित, यशस्वी आणि विराट झटपट बाद झाले. मात्र त्यानंतर अश्विनने 113 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात 376 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशला पहिल्या डावात 149 धावांवर रोखत 227ची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऋषभ पंत आणि शुबमन गिल या दोघांनी शतके केली. त्या जोरावर भारताने दुसरा डाव हा 4 बाद 287 धावांवर घोषित केला. त्यामुळे बांगलादेशला 515 धावांचे अवघड आव्हान मिळाले.

सामन्यातील चौथ्या दिवशी अश्विनने 6 आणि जडेजाने 3 विकेट्स घेत बांगलादेशचा बाजार 234 धावांवर उठवला. बांगलादेशने 4 बाद 158 धावसंख्येपासून चौथ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. नजमूल शांतो आणि शाकिब अल हसन या दोघांनी दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 2 तासांच्या आतच 6 झटके देत ऑलआऊट केले.

About Belgaum Varta

Check Also

दुबईत ‘विराट’ वादळ! शतकासह भारताचा शानदार विजय; पाकिस्तानची चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर

Spread the love  दुबई : भारतने आपल्या पारपंरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून आयसीसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *