खानापूर : मुघवडे मार्गावर मळव नजीकचा मलप्रभा नदीवरील पूल अपघातांना निमंत्रण देत आहे. पुलावर खड्डे पडून पाणी साचल्याने पूल धोकादायक बनला असून कठडे वाहून गेल्याने वाहतुकीला देखील धोका निर्माण झाला आहे.
सदर पूल हा आठ गावांसाठी आधार आहे. पूर्वी हा पूल नव्हता, तेव्हा नागरिकांना लाकडी सकवावरून ये-जा करावी लागत असे. पुलामुळे गैरसोय थांबली. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून पुरामुळे पूल ठिसूळ बनला आहे. आता तर पुलावर खड्डे पडून आणखी धोका वाढला आहे. खड्यांमध्ये पाणी साचून पुलावर तळे निर्माण होत असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. महापुरात कठडे वाहून गेले आहेत, ते दोन वर्षांपासून दुरुस्त केलेले नाहीत. वास्तविक पावसाळ्यापूर्वी पुलाची डागडुजी करणे आवश्यक होते. पण सार्वजनिक बांधकाम खाते झोपेचे सोंग घेऊन गप्प आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास पूल कोसळण्याचा धोका संभवतो. या भागातील जनतेचा एकमेव आधार असलेला हा पूल लागलीच दुरुस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.