संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर नवभारत संघातर्फे प्रारंभ करण्यात आलेली संस्कृत पाठशाळा संस्कार शिबिर ठरावे असे बेळगांव रामकृष्ण मिशन आश्रमचे स्वामी मोक्षात्मानंद यांनी सांगितले. संकेश्वर अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेत आयोजित संस्कृत पाठशाळा उद्घाटनप्रसंगी स्वामीजी बोलत होते. समारंभाचे उद्घाटक स्वामी मोक्षात्मानंद, अध्यक्ष ॲड. एस. एन. जाबण्णावर, ॲड. रामचंद्र जोशी, डॉ. रमेश दोडभंगी, शिक्षक श्रीपाद जोशी यांचे हस्ते वृक्षरोपाला जलार्पण करुन संस्कृत पाठशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक भाषण डॉ. रमेश दोडभंगी यांनी केले. स्वामी मोक्षात्मानंद पुढे म्हणाले, संस्कृत भाषा शिकण्याचे प्रामुख्याने तीन फायदे आहेत. संस्कृत भाषा आपल्याला संस्कार, संस्कृती आणि पुरुषार्थाची शिकवण देते. संस्कृत आपली देवभाषा आहे. सर्व ज्ञान संस्कृतमध्ये समाविलेले आहे. संस्कृतमधील श्लोक हे ज्ञान समृद्ध करणारे आहेत. शालेय मुलांना संस्कृतचे श्लोक संस्कारसंपन्न घडवतील. संकेश्वरात नवभारत संघाने संस्कृत पाठशाळा प्रारंभ करुन सर्वोत्तम कार्य केल्याचे श्रींनी सांगितले.
मुलांना बिघडविणारे मोबाईल..
मोबाईलमुळे मुलांमधील विचार, भावना आणि इच्छा शक्तीचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाईल देण्याचे टाळायला हवे आहे. मोबाईलचा शिक्षणासाठी उपयोग करायला हरकत नाही. पण मोबाईलमध्ये मुलांनी जादा डोकं घालणे ही चांगली गोष्ट नाहीय. मुलांची बुध्दी भ्रष्ट करण्याचे काम मोबाईल करीत आहे. मोबाईल ऐवजी मुलांना उत्तम संस्कारसंपन्न घडविणारे संस्कृत शिकवायला हवे असल्याचे श्रींनी सांगितले. उद्घाटन सोहळ्याला डी. एन. कुलकर्णी, ॲड. जी. एस. इंडी, ॲड. आर. बी. पाटील, शिवानंद संसुध्दी, दयानंद केस्ती, नगरसेवक संजय शिरकोळी, चार्टर्ड अकाॅंन्टंट शिवानंद कमते, डॉ. आळतेकर, बाबूराव मरीगुद्दी अनेक मान्यवर उपस्थित होते. आभार महेश दड्डीमनी यांनी मानले.