सर्व पूल पाण्याखाली; नदीकाठचा परिसर नियंत्रणात
निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात शुक्रवारी (ता.२१) रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने वेदगंगा व दूधगंगा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून वीरगंगा आणि दूधगंगा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान अद्यापही तालुक्यातील शनिवार अखेर विविध ठिकाणी विविध दोन्ही नद्यांवर असलेले सात बंधारे पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या गावात परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. पाण्याखाली गेलेल्या बंधार्यांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवून तहसीलदार नदीकाठच्या गावाचा आढावा घेत आहेत. या मार्गावरील वाहतूक प्रशासनाने पर्यायी मार्गाने वळवली आले. शुक्रवारी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.संजीव पाटील यांनी परिसरातील सातही बंधाऱ्यांना भेट देऊन परिस्थिती पाहणी करून पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. त्यानुसार महसूल व प्रशासकीय अधिकारी सतर्क झाले आहेत.
कोकण विभागासह तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे पाणी साठ्यात वाढ होत आहे. राधानगरी, काळम्मावाडी व पाटगाव धरण परिसरात अतिवृष्टी होत असल्याने धरणातून दोनी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. गुरुवारपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातर्फे नदीकाठच्या सर्व नागरिकांना आवाहन व सतर्कतेचा इशा देण्यात आला आहे. त्यामुळे तहसील प्रशासनाने योग्य ते काळजी घेऊन ग्राम तलाठी, ग्रामपंचायत व नोडल आधिकारी यांच्यावतीने परिसरात लक्ष ठेवून योग्य त्या उपायोजना चालवल्या आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी कुन्नूर-बारवाड, भोज, कारदगा, जत्राट सिदनाळ या बंधाऱ्यासह महामार्गावरील वेदगंगा, दूधगंगा नदी पुलांना भेट देऊन प्रत्यक्ष पूरस्थितीसह पूररेषेची पाहणी करून स्थानिक पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन सतर्क राहण्याची आदेश बजावले.
शनिवारी सकाळी २४तासात निपाणी तालुक्यात चार ठिकाणी असलेल्या पर्जन्यमापकावर ११०.१० मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यात अद्यापही नदीकाठावरील नागरी वस्ती अथवा पिकामध्ये पुराचे पाणी शिरलेले नसून परिस्थिती जैसे थे असल्याची माहिती तहसीलदार विजय कुमार कडकोळ यांनी दिली.
—————————————————————-
शहरातील जनजीवन विस्कळीत
सलग चार दिवसापासून निपाणी शहर आणि परिसरात पावसाची संतधर सुरू आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा येथील बाजारपेठेवरही चांगलाच परिणाम झाला आहे.