पाच नद्यांना वाढले पाणी : ३६ गावांना वाढला धोका
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील महाबळेश्वर, वारणा, राधानगर, अंबा, धूम, नवजा, काळमावाडी, कोयना आणि कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कर्नाटक सीमाभागातील नद्यांची पाणी पातळी वाढून नदीकाठच्या गावामध्ये पूर येत आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या पाण्यामुळे कर्नाटक सीमाभागातील ३६ गावांना धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यातील १०३ पैकी ३६ गावे दरवर्षी या तालुक्यासह महाराष्ट्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर बाधीत होतात. त्यामुळे मोठी जीवित हानी होत नसली तरी शेती आणि मालमत्तेचे होत आहे. दोन्ही तालुक्यात ५ नद्या वाहत असून तालुक्याच्या पश्चिम आणि उत्तर भागातील ३६ गावांना पुराचा फटका बसला आहे. तालुक्यातील चिकोत्रा, वेदगंगा, पंचगंगा, दूधगंगा आणि चिक्कोडी तालुक्यातील दूधगंगा व कृष्णा नद्यांना शेजारील महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी येते. चिकोत्रा नदी ही तालुक्यातील कोडणी गावातून वाहते व बुदिहाळ गावाजवळ वेदगंगा नदीला मिळते. कोडणी आणि बुदिहाळ गावांना या नदीला पूर आला आहे. गावठाण परिसरात पाणी साचल्याने काही कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वेदगंगा ही नदी बुदिहाळ गावातून वाहते. या नदीला पूर आल्यावर बुदिहाळ, यमगर्णी, ममदापूर (केएल), हुन्नरगी, भोज, कुर्ली, भाट नांगनूर,सौंदलगा, आडी, कुन्नूर, अक्कोळ आणि नांगनूर ही गावे बाधित होणार आहेत. यात भिवसी सिदनाळ, हुन्नरगी आणि जत्राट ही गावे येतात. पंचगंगा नदीही मानकापूर गावा जवळून वाहते. या नदीमुळे माणकापुर गावातील पिकांसह काही घरांना फटका बसतो. दूधगंगा नदी तालुक्यातील कोगनोळी जवळ असून या नदीमुळे कारदगा आणि बारवाड गावांना पूर येतो. त्याचा कोगनोळी, मांगूर, मलिकवाड, शिरदवाड, जनवाड, सदलगा, बेडकिहाळ, शामनेवाडी, बोरगाव या गावांना फटका बसतो. कृष्णा नदी ही नदी कल्लोळ गावातून वाहूते. त्यामुळे कल्लोळ,येडूर, येडूरवाडी, चंदुर, मांजरी, अंकली इंगळी या गावांना पूर येतो.
——————————————————————-
सात बंधाऱ्यावर पाणी
भोज-हुन्नरगी, करदगा-भोज, सिदनाळ-अक्कोळ, जत्राट-भिवशी, भोजवाडी-कुन्नूर, मलिकवाड-दत्तवाड, कल्लोळ-येडूर हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वरील मार्गावरील वाहतूक बंद असून ती दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे.
——————————————————————–
अशी सुरू आहे अन्य मार्गाने वाहतूक
एकसंबा-दानवाड, अंकली-मांजरी, बेडकिहाळ-बोरगाव, सदलगा-बोरगाव आणि यमगर्णी-सौंदलगा (राष्ट्रीय पूल-०४) पूल, मांगुर फाटा आडीमार्गे सिदनाळ आणि होणारी अशाप्रकारे वाहतूक सुरु आहे.
——————————————————————-
सीमाभागाला फटका कायम
महाराष्ट्र राज्यातील कोयना वारणा, ढोम, काळम्मावाडी, राधानगरी, नवजा, पाचगाव, राजापूर, सुळकुड आणि चिखली वरिष्ठ आणि कनिष्ठ जलाशयांमधून पाणी राज्याच्या नद्यांमध्ये येते. त्यामुळे नदीकाठच्या गावांना फटका बसणार एवढे मात्र नक्की!