खानापूर : गेल्या आठ दहा दिवासापासून खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक भागात धुवांधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या नाल्याना पाणी आले आहे.
मलप्रभा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. जांबोटी, कणकुंबी भागात पावसाचा जोर वाढला. तसे मलप्रभा नदीचे पात्र मर्यादेपेक्षा जास्त प्रवाहाने वाहत आहे. त्यामुळे मलप्रभा नदीच्या प्रवाहातून जंगलातील मोठमोठ्या लाकडांचे ओंडके वाहत येऊन यडोगा (ता. खानापूर) येथील मलप्रभा नदीच्या बंधाऱ्याला अडकले आहेत. त्यामुळे यडोगा बंधार्याला धोका निर्माण झाला आहे. संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून यडोगा बंधाऱ्याचा धोका दुर करावा, अशी मागणी या भागातील जनतेतून होत आहे.
तालुक्यातील पणजी बेळगाव महामार्गावरील खानापूर शहरालगत रूमेवाडी क्राॅस जवळ रस्त्याची दैयनिय अवस्था झाली आहे. रस्त्यावर घुडगाभर पाणी आले त्यामुळे रस्ता वाहुन गेला आहे. अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते.
हालात्री नदीला पाणी आल्याने तिवोली पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे पोलिसांनी अवजड वाहतुकीला बंदी घातली आहे.
त्यामुळे हेम्माडगा मार्ग पूर्ण पणे बंद करण्यात आला आहे.
कणकुंबी, जांबोटी भागात पावसाचा सतत मारा सुरू आहे त्यामुळे मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. हब्बनहट्टी येथील मारूती मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.
गेल्या २४ तासात झालेल्या सर्वात जास्त पावसाचे प्रमाण कणकुंबी येथे १०० मि मी इतकी पावसाची नोंद झाली आहे.
तालुक्यात झालेल्या पावसामुळे घरांची पडझड झाली आहे.