खानापूर : संपूर्ण भारत देशामध्ये 1956 मध्ये भाषावार प्रांतरचना करण्यात आली. या प्रांतरचनेमध्ये महाराष्ट्राचा एक मोठा मराठी भाषिकांचा भूभाग केंद्र सरकारने कर्नाटकाला जोडून मराठी भाषिकावर घोर अन्याय केला. या अन्यायाविरोधात केंद्र सरकारचा निषेध म्हणून एक नोव्हेंबर हा काळा दिन पाळला जातो त्या दिवसापासून आजपर्यंत सीमाभागातील मराठी भाषिक एक नोव्हेंबर हा सुतक दिन काळा दिन म्हणून पाळत आलेले आहेत. या दिवशी संपूर्ण सीमाभागात मराठी भाषिक आपले दैनंदिन कामधंदे बंद ठेवून केंद्र सरकारचा एकत्ररित्या निषेध करतात. येणाऱ्या बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी खानापूर तालुक्यातील सर्व मराठी भाषिकांनी काळा दिन पाळून आपापले व्यवहार बंद ठेवावेत यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पत्रके वाटून खानापूर शहराच्या बाजार दिवशी तालुक्यातून आलेल्या मराठी भाषिकांना व खानापूर बाजारपेठेतील व्यापारांना काळा दिन पाळण्याचे आवाहन केले.
यावेळी म. ए. समिती खानापूरचे अध्यक्ष श्री. सूर्याजी सहदेव पाटील, ज्येष्ठ नेते पी. एच. पाटील, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, माजी सभापती सुरेश राव देसाई, गजानन पाटील, राजू पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
या सर्वांनी पत्रके वाटून मराठी भाषिकांना येणारा काळा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन केले. तसेच एक नोव्हेंबर रोजी स्टेशन रोड येथील श्री लक्ष्मी मंदिर येथे सकाळी अकरा ते दोन पर्यंत लाक्षणिक उपोषण करून होणाऱ्या जाहीर सभेमध्ये केंद्र सरकारचा निषेध करावा, असे पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले.