मुंबई : मुंबईचे ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम सज्ज झालंय विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलसाठी. या सामन्यात यजमान टीम इंडियाचा मुकाबला न्यूझीलंडशी होणार आहे. विश्वचषकाच्या साखळीत धर्मशालामध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडला चार विकेट्सनी हरवलंय. पण म्हणून न्यूझीलंडच्या आव्हानाला कमी लेखता येणार नाही. कारण केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघात कमालीची गुणवत्ता आहे. याच न्यूझीलंडनं 2019 सालच्या विश्वचषकात टीम इंडियाला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळं त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी रोहित शर्माच्या भारतीय क्रिकेट संघाला आज वानखेडे स्टेडियमवर मिळणार आहे. टीम इंडियानं विश्वचषकाच्या साखळीत नऊपैकी नऊ सामने जिंकून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर आपली ताकद दाखवून दिली आहे. न्यूझीलंडच्या खात्यात नऊपैकी पाच सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये पराभव अशी कामगिरी आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही संघ वानखेडेच्या मैदानात आज आमनेसामने येणार आहेत.
यावेळी भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकात सलग 9 सामने जिंकल्यानंतर आत्मविश्वासानं भरलेला आहे, पण आता बाद फेरीतील मागील कामगिरीत फरक पडलेला नाही. रोहित ब्रिगेडला वर्ल्डकपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.
यावेळी भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी इतकी शानदार राहिली आहे की, विश्वचषकाच्या जेतेपदाची प्रतीक्षा टीम इंडिया लवकरच संपवेल अशी अपेक्षा जणू सर्वच चाहत्यांना आहे. वानखेडे स्टेडियमवरील टीम इंडियाची कोणतीही चूक कोट्यवधी चाहत्यांची मनं तोडेल हे रोहित शर्मा आणि टीमला चांगलंच ठाऊक आहे. या स्टेडियमवर 2011 मध्ये टीम इंडियानं 28 वर्षांनी एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.