जालना : जोपर्यंत या अध्यादेशाचा कायदा होऊन एकाला तरी त्या कायद्याअंतर्गत मराठा आरक्षणाचा फायदा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरु राहणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं. त्यामुळे या कायद्याअंतर्गत एकाही मराठ्याला आरक्षण मिळालं की आंदोलनाचं काय करायंच हे ठरवू. या आंदोलनाबाबत आपल्याला गाफील राहता येणार नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना या कायद्यचा लाभ झाला पाहिजे. नोंद मिळालेल्या सग्या सोयऱ्यांना सरकार काढलेल्या अधिसूचनेच्या आधारे एक तरी प्रमाणपत्र मिळे पर्यत हे आंदोलन सुरूच राहणार, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
मुंबईतील आंदोलन हे शांतेत पार पडलं. त्याच पार्श्वभूमीवर सगळ्यांचे मला फोनही आले. सर्व जण शांततेत आले गेले त्यांचे मनापासून कौतुक. यामध्ये सगेसोयरे हा शब्द फार महत्त्वाचा आहे. त्या शब्दासाठी सरकारने 15 दिवस लावले. हे अध्यादेशाचं परिपत्रक आहे. त्यामुळे याबाबत गाफिल राहून चालणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. तसेच मनोज जरांगे हे सोमवार 29 जानेवारी रायगडावर जाईन आणि 30 ला शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार त्यानंतर 31 तारखेला घरी जाणार असल्याचं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं.
खरा गुलाल त्यावेळी उधळू – मनोज जरांगे
खरा गुलाल हा कायद्याची अंमलबजावणी झाल्यावर एकाला तरी त्या कायद्याअंतर्गत प्रमाणपत्र मिळाल्यावर उधळू. त्यावेळी विजयी कार्यक्रम करु. कारण सगेसोयऱ्यांची अधिसूचना निघणे खूप महत्वाचे होते, असे राजपत्र क्वचितच निघते. याच कायद्यात रूपांतर होणार आहे. ते होईपर्यंत आपण सावध राहायचं असतं, असं मनोज जरांगेंनी म्हटलं.
कायदा झाला आणि त्याचा फायदा झाला नाही तर?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी केलेल्या महत्त्वाच्या मागण्यांमध्ये सगोसोयऱ्यांचा मुद्दा हा फार महत्त्वाचा होता. त्यामुळे या मुद्द्यावरुन मनोज जरांगे यांनी म्हटलं की, सगेसोयऱ्यांचा कायदा झाला आणि त्याचा फायदा कुणालाच झाला नाही तर? त्यामुळे सावध राहावे लागेल, हे आंदोलन गाफील ठेवून चालणार नाही. कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचंही मनोज जरांगे यांनी म्हटलं.
मनोज जरांगे यांनी त्याचं आंदोलन सुरुच ठेवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारसाठी अडचणी निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.