युवा समितीच्यावतीने मराठी पत्रकारांचा सन्मान
बेळगाव : गेली ६७ वर्ष सुरू असलेल्या सीमालढ्यात तसेच माय मराठी भाषेच्या संवर्धनासाठी बेळगाव सीमा भागातील मराठी पत्रकारांनी दिलेले योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले.
काही दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला, मराठी भाषिकांच्या वतीने अनेक वर्षाच्या मागणीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला त्यामुळे सर्व मराठी भाषिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला त्याचे औचित्य साधून युवा समितीच्या वतीने कावळे संकुल, टिळकवाडी येथे मंगळवारी सायंकाळी बेळगावमधील मराठी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
पुढे बोलताना श्री. मालोजी अष्टेकर म्हणाले की, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून गप्प न राहता येणाऱ्या काळात मराठी रुजविणे गरजेचे आहे. सीमाभागात मराठी भाषा टिकावी आणि मराठी भाषिकांचा संघर्ष संपला पाहिजे, यासाठी मराठी पत्रकार सातत्याने लिखाण करीत आहेत. त्याबाबत समिती त्यांची सदैव ऋणी राहणार आहे.
मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी युवा समितीच्या कार्याचे कौतुक केले. युवा कार्यकर्ते चांगल्या प्रकारे कार्य करीत आहेत.
येणाऱ्या काळातही सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी असेच कार्य करा, असे मत व्यक्त केले. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी प्रास्ताविक करताना युवा समितीने वर्षभर हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी उपस्थित मराठी पत्रकारांचा स्मृतीचिन्ह पुस्तक आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. राजेंद्र पोवार, कृष्णा शहापूरकर, श्रीकांत काकतीकर यांनी समायोजित विचार मांडताना सन्मानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, माजी उपमहापौर संजय शिंदे, प्रशांत भातकांडे, सुनील बोकडे, अमित देसाई, संतोष कृष्णाचे, सूरज कुडूचकर, राजू कदम, आशुतोष चौधरी, बापू भडांगे आदी उपस्थित होते.