
बेळगाव : पिरनवाडी येथे ठिकठिकाणी कचरा साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे पिरनवाडी पट्टण पंचायतीने कचरा गाड्यांचा वापर करून वेळेत कचरा उचल करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी पट्टण पंचायतीकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
येत्या सोमवारपर्यंत कचरा उचल न झाल्यास भव्य प्रमाणात मोर्चा काढण्याचा इशारा पिरनवाडी पट्टण पंचायतीला देण्यात आला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते नारायण मुचंडीकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी सदर निवेदन आज सोमवारी सकाळी पिरनवाडी पट्टण पंचायतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आले असून गावात वेळेवर कचऱ्याची उचल होत नसल्यामुळे संपूर्ण गावात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्याचबरोबर पिरनवाडीच्या परिसरातील गावातील कचरा पिरनवाडी येथे टाकला जात असल्याची तक्रार देखील यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे वेळेत कचऱ्याची उचल होत नाही तसेच गटारी साफ केल्या जात नाही त्यामुळे सांडपाणी, गटारी तुंबत असल्याची तक्रार देखील यावेळी करण्यात आली. येत्या सोमवार पर्यंत सदर समस्यांचे निवारण न झाल्यास पट्टण पंचायतीवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
पट्टण पंचायतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व निवेदनाचा स्वीकार करत कचरा समस्या वर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून समस्यांचे निवारण करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. निवेदन सादर करतेवेळी नारायण मुचंडीकर यांच्यासह रामनाथ मुचंडीकर, प्रमोद मुचंडीकर, मारुती पेडणेकर, जोतिबा चौगुले, रोहित चौगुले, सुयोग कडेमणी, प्रकाश मुचंडीकर, राजू पाटील, यांच्यासह गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
निवेदन सादर केल्यानंतर बोलताना म्हणाले की, पिरनवाडी पट्टण पंचायतीकडे कचरा गाड्या उपलब्ध असून देखील गावातील कचरा उचलण्यासाठी या गाड्यांचा वापर केला जात नाही. पट्टण पंचायत प्रशासनाने या कचरा गाड्यांचा वापर करून गाव स्वच्छ करण्यावर प्राधान्य देण्यात यावे. पिरनवाडी पट्टण पंचायत गावातील कचरा उचलण्यासाठी कचरा गाड्यांचा वापर करत नसल्यामुळे रस्त्याशेजारी तसेच खुल्या जागेत कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचला असून ग्रामस्थांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे तसेच अन्नाच्या शोधात मोकाट कुत्री व डुकरांचा वावर देखील वाढला आहे. यापुढे पट्टण पंचायतीने गावातील कचरा उचल वेळेत केली नाही तर नागरिकांनी आपापल्या घरातील कचरा थेट पट्टण पंचायतीच्या आवारात आणून टाकावा असे आवाहन यावेळी मुचंडीकर यांनी ग्रामस्थांना केले आहे. त्याचप्रमाणे येत्या सोमवार पर्यंत कचरा गाड्यांचा वापर करून गावातील कचरा उचल सुरुवात केली नसल्यास पट्टण पंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पिरनवाडी पट्टण पंचायतीमध्ये लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात नाही. तब्बल आठ वर्षे झाली तरी देखील या पंचायतीची निवडणूक झालेली नाही लोकशाही असलेल्या देशांमध्ये अद्याप नियुक्त सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे या गावचा विकास झालेला नाही. सरकारकडून पंचायतीला मुबलक निधी उपलब्ध करून दिला जातो मात्र विकासाच्या बाबतीत पट्टण पंचायतीच्या तुलनेत पिरनवाडी गाव मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. शेजारील मच्छे पट्टण पंचायतीकडून कचरा गाड्या व्यवस्थित चालविल्या जातात. गाळ काढण्यासाठी जेसीबी त्याचप्रमाणे पाणीपुरवठ्यासाठी त्यांच्याकडे टँकर देखील उपलब्ध आहेत मात्र अद्याप पिरनवाडी पंचायत मात्र या सुविधांपासून वंचित आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पिरनवाडी गावातील कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढावा अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी देण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta