बेळगाव : मण्णूर (ता जि. बेळगाव) येथील जय जनकल्याण सौहार्द संघातर्फे सामाजिक बांधिलकीतून मण्णूर गावांसाठी ‘शवरथ वाहन’ (शववाहिका) प्रदान कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
मण्णूर गावची स्मशानभूमी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. याखेरीज आजकाल अंत्यसंस्कारासाठी बहुतांशजण आपल्या वाहनांनी स्मशानभूमी पोहोचणे पसंत करतात. त्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी होणाऱ्यांसह तिगडीवरून प्रेत नेताना खांदा देणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. ठराविक व्यक्ती खांदा देण्यासाठी पूढे होतात पण त्यांची दमछाक होते. याची दखल घेत जय जनकल्याण सौहार्द सहकारी संघ व जय जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फाउंडेशन, मण्णूर यांनी सामाजिक बांधिलकीतून मयत झालेल्या व्यक्तीचे शव स्मशानभूमीपर्यंत सुलभपणे नेण्यासाठी गावाला शवरथ वाहन उपलब्ध करून दिले आहे. ही शववाहिका लोकार्पण करण्याचा कार्यक्रम मण्णूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर काल रविवारी सकाळी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक एल. के. कालकुंद्री उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन लक्ष्मण मंडोळकर, व्हाईस चेअरमन संदीप कदम, संचालक ज्योतिबा शहापूरकर, विनायक कालकुंद्री, सागर डोणकरी, संतोष केंचन्नवर, भरमा आनंदाचे, कल्लाप्पा तोरे, बसवंत नाईक, ब्रिजेश देवरमनी, सुधा बाळेकुंद्री आणि कविता सांबरेकर उपस्थित होते.
प्रारंभी संस्थापक एल. के. कालकुंद्री यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक व्यवस्थापक महेश काकतकर यांनी करून उपस्थितांचा परिचय करून दिला. शवरथ वाहनाचे पूजन एल. के. कालकुंद्री, चेअरमन लक्ष्मण मंडोळकर व व्हाईस चेअरमन संदीप कदम यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शवरथ वाहन गावासाठी देवस्की पंच अध्यक्ष मुकुंद तरळे, पंच मारुती चौगुले, अण्णाप्पा चौगुले, मारुती मंडोळकर, शिवाजी कालकुंद्री व माजी ग्रा. पं. अध्यक्ष डी. आर. शहापूरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. संस्थापक एल. के. कालकुंद्री यांनी अध्यक्ष भाषणात हा शवरथ देण्याचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमास संस्थेचे सल्लागार परशराम कदम, शितल चौगुले, लता कडोलकर, जयवंत मंडोळकर, नारायण कालकुंद्री, रामा चौगुले, रेणुका डोणकरी, सुनील जानाई, दत्तू चौगुले तानाजी तरळे, मारुती बेन्नाळकर, सिद्राय बाळेकुंद्री व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले. जय जनकल्याण संस्थेच्या या उपक्रमाबद्दल गावकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta