
बेनाडी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील मांगवाडा जवळील समुदायभवना पासून येणारे गटारीचे पाणी रस्त्या वरून वाहत आहे. त्याची विल्हेवाट मुख्य गटारीत न केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनही कोणतीच कार्यवाही कंटाळालेल्या ग्रामस्थांनी अखेर कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता.४) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन समस्येची दखल घेण्याची मागणी केली आहे.
निवेदनातील माहिती अशी, ग्रामपंचायतीने बेनाडी गावातील मुख्य रस्त्यावर मांगवाड्यातील गटाराचे पाणी पुढे वाहून जाण्यासाठी मार्ग तयार केला नाही. त्यामुळे पाणी मुख्य रस्त्यावर येते. शेजारीच शाळा असून रस्त्यावरही मोठे व वाहतूक असते. त्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. या बाबत गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी पंचायतीला कळवले आहे. पर्यावरणासह आरोग्याचा धोका आहे. येथील गटारीचे दूषितपाणी दुसरीकडे वळवले पाहिजे. गावकऱ्यांनीही पंचायतीला लेखी स्वरूपात कळवले आहे. त्याबाबत ११ नोव्हेंबर २४ रोजी अर्ज सादर केला आहे. त्यावेळी त्यांनी दोन ते तीन महिन्यांत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे २१ जानेवारी २०२६ रोजी पुन्हा लेखी अर्ज सादर करून काम न झाल्यास धरणे आंदोलन कोणाचा इशारा दिला होता. त्यावेळी तालुका अधिकाऱ्यांनी पुन्हा आश्वासन देऊन तक्रार अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले होते. तरीही आज तागायत काम झालेले नाही.
काहींनी कालवा अडविल्याने पावसाळ्यात कालव्याचे पाणी ओढ्यात न जाता मागासवर्गीय नागरिकांच्या शेतात जाऊन नुकसान होत आहे. याबद्दल सिंचन विभागाकडे चौकशी केली असता गावातील गटाराचे पाणी कालव्यात येते. त्यामुळे गटाराचे पाणी कालव्यात येण्यापासून रोखावे आणि मग आम्ही कालव्याच्या पाण्यासाठी मार्ग मोकळा करू असे सांगण्यात आले आहे. पंचायतीने यासाठी पैसे घेऊन काही काम केले आहे. सिंचन विभागाचे अधिकारी ऐकायला तयार नाहीत. आम्ही या कामाबद्दल पीडीओ, ग्राम प्रशासक आणि तालुका अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगितले आहे. त्याचा काही उपयोग नाही असेही सांगितले आहे. २५ एप्रिल पर्यंत काम न झाल्यास ग्रामस्थ आणि कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतला टाळे ठोकून धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदन स्वीकारून संबंधित जागेची चौकशी करण्याचे आदेश देऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी अशोक क्षीरसागर, काशिनाथ सांगावे, विजय पाटील, सुरेश चंदुरे, ए. जी. कोटगे, मल्लेश बन्ने, विठ्ठल गुरव, सचिन कोटगे, शिवाजी लोहार, अशोक भोरे यांच्यासह शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta