खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या आवाहनाला प्रतिसाद
बेळगाव (वार्ता) : बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरिता गेल्या ६५ वर्षांपासून लढा सुरु आहे. अनेकांनी हा प्रश्न सुटावा याकरिता आपले जीवन समर्पित केले, काहींनी तर आपले बलिदान गेले. सामान्य मराठी माणसापासून ते विविध नेत्यांनी, पत्रकारांनी, कवी-लेखकांनी, कलाकारांनी आपआपल्या परीने हा प्रश्न सुटावा याकरिता महत्वपूर्ण योगदान दिले. असा हा धगधगता लढा आजतगायत सूरु आहे.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सीमाप्रश्नी मा. पंतप्रधानांनी लक्ष घालून सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवावा याकरिता अष्टे येथील नागरकांनी पुढाकार घेत #letter To PM या मथळ्याखाली पत्र मोहिम राबवत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सुमारे २०० पत्रे मा. पंतप्रधानांना पाठवली.
“सीमाप्रश्न मार्गी लावून ४० लाख मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामील करून न्याय द्यावा.” आशा भावना अष्टेवासियांनी व्यक्त केल्या.
तसेच यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण युवा समिती पदाधिकारी सुधीर शिरोळे म्हणाले, हा मराठी भाषिक सीमाभाग कर्नाटकात घातल्यामुळे स्थानिक मराठी तरुणांना येणाऱ्या कोणत्याही सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थान नाही, फक्त कानडी लोकांना नोकऱ्या दिल्या जात आहेत, तसेच कन्नड सक्ती केली जात आहे, मराठी संपवण्याचा प्रयत्न कर्नाटक शासन करत आहे. मा. प्रधानमंत्री मोदींनी तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देवून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली.
तसेच अष्टे येथील नागरिक मलाप्पा लाड यांनी सीमाभागात सरकारी कार्यालयात, सरकारी कागदपत्रे तसेच बसवरील फलक, सार्वाजिक फलक फक्त कन्नडमध्ये लावले जात आहेत, बहुभाषिक मराठी असून मराठीतून सर्व सरकारी सुविधा मराठीतून मिळत नाहीत, मराठीची गळचेपी होत आहे, पंतप्रधान मोदींनी ८६५ गावांचा हा मराठी प्रदेश महाराष्ट्रात सामील करून आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती केली.
यावेळी अशोक तरळे, सचिन लाड, जोतिबा लाड, विनोद लाड, सिद्राई लाड, प्रदीप लाड, गुंडू तरळे, प्रवीण लाड, गंगाराम लाड, कृष्णा लाड, सुंदर लाड, राहुल लाड, केतन तरळे, अजित तरळे, बसावानी लाड, संदीप लाड, तसेच महिला छाया तरळे, लक्ष्मी तरळे, सर्वज्ञा तरळे, अर्पिता तरळे, संजना लाड, निर्मला लाड, लक्ष्मी लाड, रत्ना लाड, समीक्षा लाड यांनी पत्र मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कामगिरी बजावली..!