बेळगाव : संपूर्ण जगात अशांतता पसरलेली पाहायला मिळत आहे. भेदभाव हिंसाचाराला महत्त्व दिले जात आहे. अशा काळात तरुण पिढीला नव्या दिशेने नेण्याचे आव्हान उभे आहे. समाजात सकारात्मक विचारांचे बीज पेरण्याचे काम माध्यमांना करावे लागेल, असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या पीस ऑफ माईंड टीव्हीचे निवेदक राजयोगी श्रीनिधी यांनी बोलताना केले.
आज सकाळी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या महांतेश नगर येथील बेळगाव शाखेच्या वतीने बेळगावातील माध्यमकर्मींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजयोगिनी अंबिका बेन उपस्थित होत्या. त्याच बरोबर ज्येष्ठ पत्रकार मुरगेश शिवपुजी, श्रीकांत काकतीकर, दिलीप कुरुंदवाडे आणि कृष्णा शहापूरकर या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना श्रीनिधी म्हणाले, माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. मात्र, आजच्या काळात फेक न्युज वाढल्या आहेत. त्याचे विपरीत परिणाम पाहायला मिळत आहेत. मीडिया ट्रायल चालविल्या जात आहेत. माध्यमांना मिळालेले स्वातंत्र्य एक शक्ती आहे मात्र हीच शक्ती कमजोरी बनत आहे. सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. माध्यमांमधून हिंसाचाराला महत्त्व दिले जात आहे. त्याचे विपरीत परिणाम समाजामध्ये अशांती स्वरूपात दिसत आहेत. अशा वेळी समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम माध्यमांना करावे लागेल. प्रत्येकालाच आत्मचिंतनाची गरज आहे, असेही श्रीनिधी यांनी स्पष्ट केले.
राजयोगिनी अंबिकाबेन म्हणाल्या, अशांततेमुळे विश्वाची हानी होत आहे. आजच्या युगात प्रत्येकालाच शांती ची नितांत आवश्यकता आहे. यासाठी वाईट गुणांचा त्याग करावा लागेल. प्रत्येकाने आपणा मधील आत्मशक्तीला ओळखावे लागेल. चारित्र्यवान गुणवान होण्यासाठी अध्यात्मिक शिक्षणाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित प्रमुख अतिथीनी समयोचित विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक ब्रह्मकुमारी विद्या बेन यांनी केले. अतिथींचा परिचय ब्रह्मकुमार श्रीकांत भाई यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी ब्रह्मकुमार मनोहर भाई यांनी आभार मानले.