बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊन 8 महिने उलटून गेले तरी अद्याप महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रभागांमधील कोणतीही कामे होत नाही आहेत. तेंव्हा बेळगाव महापौर-उपमहापौर निवडणूक तात्काळ घेण्यात यावी, अशी मागणी 15 हून अधिक नगरसेवकांनी केली आहे.
बेळगाव महापालिकेची निवडणूक होऊन 8 महिने झाले आहेत, मात्र अद्यापपर्यंत महापौर उपमहापौर पदाची निवडणूक झालेली नाही. त्यामुळे नगरसेवक होऊन देखील कोणत्याही प्रकारे कायदेशीर अधिकार प्राप्त न झाल्यामुळे निवडून आलेल्या काँग्रेस, एमआयएम आणि अपक्ष नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सोमवारी सकाळी प्रादेशिक आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन 15 हून अधिक नगरसेवकांनी तात्काळ महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी करत त्या आशयाचे निवेदन सादर केले.
यावेळच्या बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने 58 पैकी 35 जागा जिंकून बहुमत सिद्ध केले आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना तसेच निवडणुकीत 35 जागा जिंकून बहुमत प्राप्त झालेले असतानाही बेळगाव महापौर -उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यास इतकी दिरंगाई का? असा प्रश्न आम्हाला पडला आहे. खरे तर निवडणुकीत बहुमत प्राप्त झाल्याने राज्यातील भाजप सरकारने तातडीने बेळगाव महापौर -उपमहापौर पदाची निवडणूक घ्यावयास हवी होती मात्र अद्यापपर्यंत तसे घडलेले नाही हे दुर्दैव आहे, अशा शब्दात नगरसेवक रवी साळुंके यांनी खेद व्यक्त केला.
नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी महापालिका निवडणूक होऊन 8 महिने झाले असले तरी नगरसेवक या नात्याने अद्यापपर्यंत आम्हाला कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रभागांमध्ये विकास कामे राबविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. प्रभागातील नागरिकांच्या समस्या कशा सोडवाव्यात हे आम्हाला समजेनासे झाले आहे असे सांगून अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यास त्यांच्याकडून असहकार्याची वागणूक मिळत आहे अशा शब्दात असमाधान व्यक्त केले.
निवेदन सादर करतेवेळी नगरसेविका वैशाली भातकांडे, लक्ष्मी लोकावी, पूजा पाटील, महंमद संगोळ्ळी, बाबाजान माडीवाले आदी नगरसेवक उपस्थित होते.
Check Also
ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रमाची आवश्यकता : वाय. पी. नाईक
Spread the love बिजगर्णी…(बेळगाव) : विद्यार्थी दशेत आपल्याला कोण व्हायचे आहे ते निश्चित करणं गरजेचं …