बेळगाव : गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसामुळे नद्या धोक्याच्या पातळ्या ओलांडत आहेत. कृष्णा नदी काठावरील अनेक पूल पाण्याखाली आल्याने आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कागवाड आणि अथणी परिसरातील कृष्णा नदी काठावरील परिसराची पाहणी केली.
संपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृष्णा नदीतील पाण्याच्या वाढत्या पातळीसंदर्भात माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक संतोष पाटील यांनी अथणी आणि कागवाड परिसरात भेट दिली. पावसाचा ओघ पुढील काळात देखील असाच राहिल्यास पूरपरिस्थिती ओढवण्याची शक्यता आहे. कृष्णा नदी काठावरील 8 पूल आधीच पाण्याखाली गेले आहेत. यामुळे ग्रामीण भागात बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. पूर परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या नुकसानग्रस्तांना तांत्रिक कारणामुळे भरपाई मिळाली नसून, अशा नुकसानग्रस्तांना लवकरच भरपाई देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. १ कोटी ४८ लाख रुपये नुकसानग्रस्तांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. दूधगंगा वेदगंगा या नद्यांसह जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी धोक्याच्या पातळीवर आली असून नदी काठावरील जनतेला सावधानतेच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.