
बेळगाव : बेळगावात पावसाने थैमान घातले आहे. संततधार पावसामुळे सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बेळगाव परिसरात मागील 15 दिवसांपासून पावसाची संततधार चालूच आहे. मात्र गुरुवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.
वडगावमधील अन्नपूर्णेश्वरी नगर, केशवनगर, साई कॉलनीचा काही भाग पाण्याखाली गेला आहे. अन्नपूर्णेश्वरी नगर सहावा क्रॉस येथील रस्ता जलमय झाला आहे. काही लोक खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर स्थलांतरित झाले आहेत मात्र एकच मजला असलेल्या लोकांची पाणी बाहेर काढण्यासाठी धडपड सुरू आहे.
मागील 4 वर्षांपासून केशवनगर, अन्नपूर्णेश्वरी नगर या भागात पावसाच्या पाण्याची समस्या उद्भवत आहे. केशवनगर, अन्नपूर्णेश्वरी नगर ही नवीन वसाहत आहे. या भागात गटारी नाहीत त्यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. वारंवार मागणी करून देखील लोकप्रतिनिधींनी या भागातील नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी या भागातील घरांमध्ये पाणी शिरते. लोकप्रतिनिधी येतात पावसाळा संपला की नाल्याचे काम पूर्ण करू असे आश्वासन देऊन निघून जातात. नेहमीची येतो पावसाळा अशी अवस्था या भागातील लोकांची झालेली आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर गणेश कॉलनीचा काही भाग वगळता ठराविक भागात पेव्हर्स बसविण्यात आले आहेत, मात्र गटारींची सोय नसल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यात बळ्ळारी नाल्याची स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे सांडपाण्याबरोबर पावसाचे पाणी देखील सखल भागात साचून राहते. त्यामुळे या भागातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच पेव्हर्सचे काम देखील निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे अनेक ठिकाणी पेव्हर्स उखडून पडलेली पाहायला मिळत आहेत.
स्मार्टसिटीचे तुणतुणे वाजवणारे राष्ट्रीय पक्षाचे लोकप्रतिनिधी अन्नपूर्णेश्वरी नगर, केशवनगर भागातील लोकांच्या समस्येकडे लक्ष देतील का? असा प्रश्न या भागातील जनता करीत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta