बेळगाव : मुसळधार पावसाने बेळगावात जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही वसाहती पाण्याखाली गेल्या असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरून लोकांचे हाल होत आहेत. या सर्व समस्या तीव्र होऊनही लोकप्रतिनिधी व अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुसळधार पावसाने बेळगावातील जनता अक्षरश: हैराण झाली आहे. वरुणराजा पुरे कर तुझा कहर असेच लोक म्हणत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओमनगरमधील रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहत आहे. रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. लेंडी नालाही भरला असून पाणी रस्त्यावर वाहत घरांमध्ये शिरले आहे. इथला रस्ता कोणता? अन् नाला कोणता माहित नाही अशी स्थिती आहे. सगळीकडे नुसते पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांना घराबाहेर पडताही येत नाही. पावसामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असतानाही महापालिकेचे अधिकारी व स्थानिक आमदारांनी याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.