बेळगाव : स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळेत ध्वजवंदन करून घरी परतणार्या बालिकेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना काकती येथे घडली. यात ती बालिका जखमी झाली आहे.
बेळगाव तालुक्यातील काकती येथे घडलेली ही घटना उशिरा उघडकीस आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवात ध्वजवंदन करून घरी परतणार्या लक्ष्मी रामप्पा नायक या 12 वर्षीय मुलीवर 10-12 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. तिला ओढत नेत असताना त्याच मार्गावरून जाणारा गॅस डिलिव्हरी बॉय संजू धोनजी याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या मुलीला कुत्र्यांपासून वाचवून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.
ग्रामपंचायत सदस्य गजानन गव्हाणे यांनी भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी करण्यासाठी अनेकदा आवाहन करूनही उपयोग झाला नसल्याची नाराजी व्यक्त केली. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी काकती ग्रामस्थांनी केली आहे.