आ. श्रीमंत पाटील यांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट
बेळगाव : कागवाड व अथणी तालुक्यात अनेक शेतकरी द्राक्ष पीक घेतात. मात्र, गेल्या दोन – तीन वर्षात पावसामुळे आणि वादळामुळे द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, शासन नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या समस्यांवर सभागृहात चर्चा करून योग्य तोडगा काढण्याची वेळ निश्चित करावी, अशी विनंती माजी मंत्री व आमदार श्रीमंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे – कागेरी यांच्याकडे केली.
आमदार श्रीमंत पाटील पत्रकारशी बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देणार आहे. पाऊस, खराब वातावरण, वादळामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष उत्पादकांना योग्य मोबदला मिळावा आणि शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. अधिवेशनात द्राक्ष उत्पादकांबाबत चर्चा करण्यासाठी वेळ निश्चित करण्याची विनंती केली असून लवकरच परवानगी दिली जाईल. सभागृहात या विषयावर चर्चा करण्यासाठी व या भागातील शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांमधून समाधान व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta