बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज दोन महत्वाचे ठराव मंजूर केले यामध्ये समाजात निधनानंतर 12 दिवसाचा दुखवटा पाळण्यात येतो तो यापुढे सात दिवस पाळावा व पतीच्या निधनानंतर महिलांचा बांगड्या फोडण्याचा विधी स्मशानात न करता तो घरीच करावा.
मराठा समाज सुधारणा मंडळ पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण करत आहे त्यानिमित्ताने अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष शिवराज पाटील, खजिनदार के. एल. मजूकर व सहचिटणीस संग्राम गोडसे होते.
यावेळी बोलताना श्री. मरगाळे म्हणाले, मंडळाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन करण्याबरोबरच स्मरणिका काढणे, समाजातील सर्वच क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी बजावून समाजाला दिलेले योगदान लक्षात घेऊन अशा व्यक्तीचा सन्मान करणे व अन्य उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच वरील संमत करण्यात आलेल्या पराभवाची अंमलबजावणी होण्यासाठी विभागवार बैठका घेण्याचे ठरविण्यात आले.
प्रारंभी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले तर संग्राम गोडसे यांनी मागील वर्षाचे इतिवृत वाचून त्याला मंजुरी घेतली. सन 2021-22 चा जमाखर्च के. एल. मजूकर यांनी मांडून त्याला मंजुरी घेतली. 2022-23 सालासाठी अनिल मंडोळकर यांची सी.ए. तर सहाय्यक म्हणून सुनिल आनंदाचे यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.
यावेळी नेताजी जाधव, गोपाळराव बिर्जे, शिवाजी हंगिरकर, मोहन कंग्राळकर, महादेव पाटील, दीपक किल्लेकर, पी. ए. पाटील यांनी आपले विचार मांडून उपयुक्त सूचना केल्या. ईश्वर लगाडे यांनी आभार मानले.
सर्वसाधारण सभेस रघुनाथ बांडगी, मोहन सप्रे, राजू पावले, एस.ओ. जाधव, दत्तात्रय जाधव, शीतल वेसणे, महेश जुवेकर, प्रकाश गडकरी या कार्यकारिणी सदस्यांसह बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta