बेळगाव : सीमाप्रश्नावरून हिरेबागेवाडी टोल नाक्यावर उच्छाद मांडून दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण निर्माण केलेल्या कर्नाटक रक्षण वेदिकेने महाराष्ट्रात कन्नडिगांना धोका असल्याचा कांगावा करत त्यांना सुरक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली आहे. त्यामुळे चोराच्या उलट्या बोंबा! या म्हणीचा प्रत्यय आला आहे.
बेळगावात पोलिसांनी प्रवेशबंदी करूनही दोनच दिवसांपूर्वी बेळगावातील हिरेबागेवाडी टोल नाक्यावर आपल्या समर्थकांसह धिंगाणा घातलेल्या कर्नाटक रक्षण वेदिकेच्या टी. आर. नारायनगौडा याच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नावाचे निवेदन अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना देण्यात आले.
या निवेदनात करवेने महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांना तेथील राजकीय पक्ष आणि लोकांमुळे धोका निर्माण झाल्याचा कांगावा केला आहे. भाषावर प्रांतरचनेनंतर कर्नाटकाचा मोठा भाग महाराष्ट्रात गेला तरी देशाच्या एकतेसाठी कर्नाटक हे सहन करत राहिला. पण आता सीमाप्रश्न पुन्हा पेटल्याने महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांवर, त्यांच्या मालमत्तेवर हल्ले केले जात आहेत. त्याला शिवसेनेचे दोन्ही गट, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्वच पक्षांचा पाठिंबा असल्याचा बिनबुडाचा आरोप करून तेथील कन्नडिगांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी अशी मागणीही निवेदनात केला आहे. करवे राज्य संचालक महादेव तळवार यांनी अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदनातील मागण्या वाचून दाखवल्या. यावेळी सुरेश गड्डण्णावर, गणेश रोकडे, बाबू जडगी, कलमेश कोडकणी आदी उपस्थित होते.