बेळगाव : रिंगरोड प्रकल्प रद्द करेपर्यंत शेतकरी शांत बसणार नाहीत. शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन संपादित करून विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याला देशोधडीला लावणाऱ्या सरकारविरोधात सोमवार दि. 23 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजता झाडशहापूर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे.
यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की, रिंगरोडमुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत येणार आहे. कर्नाटक सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा आहे हे योग्य नाही. त्यामुळे हा रिंगरोड पूर्णपणे रद्द होईपर्यंत या प्रस्तावाला विरोध करण्यात येईल व हे शेतकऱ्यांचे आंदोलन असेच चालू राहील असा इशारा यावेळी किणेकर यांनी दिला.
यावेळी बोलताना आय. आर. पाटील म्हणाले की, तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे हा रिंगरोड प्रकल्प हाणून पाडण्यासाठी शेतकरी वर्गाने संघटीत राहावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी युवा नेते आर. एम. चौगुले, भागोजी पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. एम. जी. पाटील यांनी देखील आपले विचार मांडले.
बैठकीला देसूर ग्रा. पं. अध्यक्षा लक्ष्मी पिरनवाडी, दत्ता उघाडे, पुंडलिक पावशे, माजी एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, मल्लाप्पा गोरल, नागेश सावंत, नारायण होसूरकर, अशोक कोलकार, मनोज पिरनवाडी, तुकाराम गोरल, पार्वती बेळगावकर, भरमा सुतार, नारायण मयेकर आदींसह गावकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta