
“लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात!” असा एक वाक्प्रचार प्रचलित आहे याचाच अर्थ असा की लहान मुलं ज्या ज्या गोष्टी बालपणात करीत राहतात त्यातच त्यांचं भावी कर्तृत्व दडलेलं असतं.
बेळगाव तालुक्यातील मण्णूर हे गाव, याच गावातली ही अशीच एक कहाणी आहे. ती काहणी ४९ वर्षापूर्वी म्हणजेच दिनांक ०५ एप्रिल १९७४ रोजी जन्माला आलेले श्रीयुत राजू चौगुले यांची आहे.
पाच भावंडात चौथ्या क्रमांकावर जन्माला आलेले श्री. राजू चौगुले लहानपणी मोडलेली खेळणी जोडून आपला खेळ मांडायचे, भावंडानी वापरून जुने झालेले कपडे वापरायचे. खरंतर हा संकेत होता पुढे अभियंता व्हायचा…..!
पिता कै. श्री. म्हात्रु चौगुले हे घामाशी आणि कष्टाशी आजीवन सांगड घातलेलं व्यक्तीमत्व…..
बेताचीच आर्थिक परिस्थिती लाभलेल्या कुटूंबाला सावरण्यासाठी कै. श्री. म्हात्रु चौगुले यांच्या समोर राबराब राबल्या शिवाय दुसरा पर्यायच नव्हता.
वर उल्लेख केल्याप्रमाणे श्रीयुत राजू चौगुले यांच्या नशीबी नवीन खेळणी अपवादात्मक होती.
कारण भावंडानी खेळून मोडलेली खेळणीच त्यांच्या पदरी पडायची. मग त्या मोडलेल्या खेळणीत नवनिर्मिती करून आनंद लुटणे हाच पर्याय राजू चौगुले यांच्याकडे होता. मोडकी खेळणी जोडता जोडता समाजामध्ये परिस्थितीने कणा मोडलेली, थकलेली, अडलेली, नडलेली असंख्य माणसं ते जोडत गेले आणि आज याच माणसांची आणि तरुणांची मांदियाळी घेऊन तालुक्यात ते आपलं नेतृत्व फुलतांना दिसत आहेत.
शाळा शिकताना हातात क्वचितच पेन, पुस्तक असायचं. हातात असलं तर ते काय?
शेतीची अवजारे, घरची जनावरे आणि बांधकामाची साधणं. आजच्या मुलांना शनिवार रविवारची सुट्टी म्हणजे मौजमजा, पोहणं, चित्रपट पाहणं किवा सहलीत व्यस्त असणं! याला राजू चौगुलेंच जीवन अपवादात्मक होतं कारण सुट्टी म्हणजे डबा बांधून घ्यायचा आणि रोजंदारीच मिळेल ते काम करायचं आणि पाच-दहा रूपये मिळवायचं आणि आई-वडीलांच्या हातात द्यायचे. कधी रंग काम, कधी माल कालवणं, कधी गवंडी काम करीत, कधी थापी, कधी ब्रश तर कधी हातात कुदळ आणि खांद्यावर कुऱ्हाड घेऊन हा युवराज घडत राहिला. हे सारं होत असताना शिक्षणाला त्यांनी बगल दिली नाही. मुळात कुशाग्र बुध्दीचं वरदान आई श्रीमती द्रोपदीबाई यांच्याकडून मिळाल्याने यांचं प्राथमिक शिक्षण मण्णूरच्या सरकारी मराठी शाळेत पूर्ण झालं. पुढे ते माध्यमिक शिक्षण हिंडलगा हायस्कूलमध्ये तत्कालीन उत्कृष्ट सहशिक्षक व बहुआयामी मुख्याध्यापक, माजी महापौर श्री. मालोजीराव अष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेऊ लागले. अव्वल गुणवत्ता घेऊन दहावी उत्तीर्ण झाल्यावर बेळगावच्या सुपरिचित आर. एन. शेट्टी पाॅलिटेक्निक काॅलेजमधून उत्तम टक्केवारीसह सिव्हिल डिप्लोमा पूर्ण केला. पुढे शिकायची इच्छा होती पण परिस्थिती नव्हती म्हणून कामाला आणि घामाला महत्त्व द्यायचं ठरविलं. जिद्द, चिकाटी, संयम यांची शिदोरी सोबत घेऊन प्रामाणिकपणे छोटीछोटी बांधकामाची कामं आकाराला येऊ लागली. याच गडबडीत त्यांनी सिव्हिलमध्ये आपलं बी ई पर्यंतच शिक्षणही पूर्ण केलं.
ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग वाढवून अडचणींचे अनेक चढउतार पार करीत श्रीयुत राजू चौगुले सपाटून काम करू लागले! काम करीत असताना आपल्या सारख्या अनेक कष्टकरी तरूणांच्या संपर्कात आले आणि याच रिकाम्या हाताने काम देण्यासाठी श्रीयुत राजू चौगुलेनी “आर. एम. चौगुले असोशिएट बिल्डर अॅन्ड डेव्हलपर्स” नावाची फर्म उघडली त्यानंतर याचं रूपांतर “वननेस बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स” या कंपनीत केलं आहे. तालुक्यातील सुतार, बांधकाम कामगार, वीट वाळू व्यवसायिक, फॅब्रीकेटर्स, इलेक्ट्रिकल कामगार, प्लंबर, पेन्टर अशा चार पाचशेहून अधिक कामगारांना बारमाही काम यातून मिळत गेलं आहे. आज बेळगावातील मोजक्या नामांकित बांधकाम इंजिनिअर्समध्ये राजू चौगुले यांच्या नावाची गणना होते ही मराठी माणसाच्या अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे. व्यवसायात पुढे येऊ पाहणाऱ्या तरूणांना त्यांनी दाखवून दिलं की….. अडचणी जीवनात नाहीत तर मनात असतात मनावर विजय मिळविला की आपोआप यशाची उज्ज्वल दिशा मिळत जाते. त्यांनी केलेल्या या धाडसामुळे श्रीयुत राजू चौगुलेंच्या जीवनाची दिशाच बदलली. पै-पैशासाठी धडपडणाऱ्या या तरूणाच्या दर्जेदार कामामुळे लक्ष्मीचा वरदहस्त लाभला आहे. व्यवसायधंद्यात व्यस्त असताना आपल्या सामाजिक जाणीवेचे नेणीवेचे त्यांचे भान अबाधित होते. आपल्या कामातून मिळालेल्या मोबदल्यातील काही भाग ते नेहमी गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी खर्च करीत आले आहेत. यात असंख्य विद्यार्थ्यांची फीज भरली, आजारी माणसाना आर्थिक साहाय्य केले, शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांना मदत करीत राहिले आणि विशेष म्हणजे त्यांनी कधीच याचं प्रदर्शन मांडलं नाही किवा वर्तमानपत्रात प्रसिध्दी देऊन बाजारही मांडला नाही. एका हातानं दिलं दुसऱ्या बाजूला विसरून टाकलं एवढच त्यांना माहीत. हे सगळं करीत असताना श्रीयुत राजू चौगुले मराठी भाषेच्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीशी स्वतःची नाळ जोडून होते. अन्याय, अत्याचार याची मनस्वी चिड असणारा हा युवा ज्येष्ठ नेते माजी आमदार मनोहर किणेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व अनेक लहान थोर नेते मंडळीच्या प्रेरणेतून एकीकरण समिती देईल ती जबाबदारी ते घेत गेले. गेली दोन दशके या कामी “कमी तिथे आम्ही!” म्हणत ते कार्यरत आहेत हे आपण जाणता.
महाराष्ट्र एकीकरण समितीशी वर्ष 2000 सालापासून आजतागायत श्रीयुत आर. एम. चौगुलेनी स्वतःची नाळ जोडली आहे. तत्कालीन जिल्हा पंचायत सदस्य मान श्री. उदय सिध्दनावर व तालुका पंचायत सदस्य मान श्री. एस. एल. चौगुले यांना बहुमतानी निवडून आणण्याचा वीडा उचललेल्या युवकांमध्ये आर. एम. हे नाव अग्रस्थानी होते. पुढे २००४ मध्ये म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार श्री. मनोहर किणेकर यांना निवडून आणण्यासाठी तालुक्यातील युवकांना मोठ्या हिमतीने एकवटून युवा शक्तीची ताकद दाखत विजयश्री खेचून आणला हे ही आपणास ज्ञात असावे.
वेळोवेळी महाराष्ट्र एकीकरण समितीने काढलेले मोर्चे असतील, शेतकरी आंदोलने असतील, मराठी भाषेवर झालेल्या अन्यायाचे निषेध असतील, लेले ग्राऊंडवर आयोजित महामेळावे असतील किवा कोल्हापूर, मुंबई येथे आयोजित सभा असतील प्रत्येक ठिकाणी आर. एम. चौगुले जातीने आपल्या मित्रपरिवारासह हजर राहून आपलं समर्थन आणि समर्पण दाखवत आले आहेत.
अजात शत्रू असलेले श्रीयुत आर. एम. चौगुले याची हुशारी व कर्तव्य शिध्दता पाहून मण्णूरचे सुप्रसिद्ध उद्योजक कै श्री. आर. डी. चौगुले व मान. एन. एस. चौगुले यांनी २००६ साली जोतिर्लिंग मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमनपद बहाल केले, याच कार्यकाळात सोसायटीची चौफेर प्रगती झाली. त्यानंतर आजतागायत श्रीयुत आर. एम. चौगुले मार्कंडेय सोसायटीचे संचालकपद भूषविताहेत. बेळगाव परिसरात विविध शाखा असलेल्या पतपेढीच्या माध्यमातून अनेक गरजवंताच्या आर्थिक गरजा तात्काळ भागविण्याचे कसबही त्यांनी सिद्ध केले आहे. या युवा नेतृत्वाचं प्रत्येक पाऊल जनतेच्या विकासासाठीच पडत होतं आहे आणि असेल.
म्हणूनच………..
श्रीयुत आर. एम. चौगुले आज बेळगाव तालुक्यातील तरूणाच्या व आबालवृद्धांच्या गळ्यातील कर्तृत्वाचा ताईत बनून काम करताहेत.
बेळगाव, खानापूर, बैलहोंगल, धारवाड, हुबळी, कोप्पळ, बेळ्ळारी अशा विविध भागात या शहरांची शान वाढवणारी व्यापारी व रहिवासी संकुल आणि सरकारी कार्यालये बांधून नावलौकिक वाढवणारा हा तरूण ख्रिश्चन, मुस्लिम, ब्राह्मण, लिंगायत, हरिजन, मराठा, कुंभार, हिंदू आणि इतर धर्मियांची आपल्या कामाच्या माध्यमातून जिव्हाळ्याचे संबंध ठेऊन आहे.
शिक्षणावर नितांत प्रेम करणाऱ्या श्री. आर. एम. चौगुलेनी आपल्या वडिलांच्या नावे “कै. श्री. एम. डी. चौगुले प्रतिष्ठान” स्थापणार करून बेळगाव तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन गेली सहा सात वर्षे सातत्याने दिले जाते आहे. तालुक्यात गुणवत्ता यादित येणारे विद्यार्थी याच व्याख्यानमालेचे हजरार्थी असतात हे महत्वाचे आहे. शिवाय गुणवंत विद्यार्थ्यांचा भरघोस रोख बक्षीसं देवून गौरव केला जातो.
देव धार्मिक कामासोबत संत सांप्रदायीची आणि तालुक्यातील नवोदित खेळाडुंची नेहमी विशेष दखल घेणारा या युवा नेत्याचा जात, भाषा, धर्म, प्रांत या पलिकडे जाऊन माणुसकीचा सेतू बांधणारा यांचा स्वभाव अनेक प्रेरणेची आणि प्रेमाची वलये निर्माण करणारा आहे. याचा फायदा नक्कीच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीला स्फुरण देणारा ठरणार आहे. वेळेने मार्ग दाखवलेला, काळाने शिकवलेला, नकाराने वाढवलेला आणि अपमानाने घडवलेला हा तरूण आज तालुक्याचा युवराज म्हणून नावारूपाला येत आहे. बेळगाव तालुक्यातील जनतेला त्यांच्यात स्वार्थपेक्षा विधायक कामाची साथ दिसते, या युवा नेत्याचं व्यक्तिमत्व प्रत्येक बाबतीत सुखावणारं आहे ते मुळीच दुखावणार नाही, ते तालुक्यात नक्कीच बदल घडविणारं आणि अन्यायाचा बदला घेणारं आहे. यांच्या कार्यात आई द्रोपदी, उद्योजक बंधू एस. एम. चौगुले, श्री. सुधाकर एम. चौगुले व प्रसिद्ध ठेकेदार श्री. डी. एम. चौगुले यांच्यासह त्यांची पत्नी सौ. प्रिती चौगुले (तानवडे) व मुलगा कु. तनिष्क, मुलगी कु. भक्ती यांचही योगदान मोलाचं आहे. असा हा हरहुन्नरी युवराज आज आपल्या वयाची ४९ वर्षे पूर्ण करून ५०व्या वर्षात म्हणजे वयाच्या सुवर्ण वर्षी आज बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी पदार्पण करतो आहे….संयम जिद्द आणि प्रामाणिकपणा अखंडपणे सोबतीला घेऊन वाटचाल करणाऱ्या सीमाभागातील युवा नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…. शुभम भवतू
प्रा. सौ. छाया (मोरे) पाटील, राकसकोप-बेळगाव.
Belgaum Varta Belgaum Varta