
बेळगाव : राज्यात पावसाळा सुरू होत असल्याने अतिवृष्टी व पुराच्या स्थितीत पिकांच्या नुकसानीची स्पष्ट माहिती संबंधित जिल्हा आयुक्तांनी तातडीने मिळवावी. शेतकऱ्यांना दर्जेदार पेरणी बियाणे, खते आणि कीटकनाशके वेळेत पुरविण्यात यावीत, अशा सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिल्या.
पावसाळा, अतिवृष्टी आणि संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत त्यांनी मंगळवारी (२२ मे) राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला.
पूर व्यवस्थापनात बेजबाबदारपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला.
पूरप्रवण क्षेत्रे ओळखा आणि आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करा. शाळेची इमारत व पूल मोडकळीस आलेले असतील तर त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची आपत्ती होऊ नये यासाठी कार्यवाही करावी. नुकत्याच झालेल्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची तातडीने भरपाई द्यावी. जीवितहानी टाळण्यासाठी जी काही कृती आवश्यक असेल ती तातडीने करावी. खबरदारी न घेतल्यास जीवितहानी होईल. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी कारवाई करावी, अशा सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारे आवश्यक ती पावले उचलावीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta