बेळगाव : दि. २८/०७/२०१४ रोजी उचगाव ग्रा. पं. चे सेक्रेटरी सदयाप्पा बसाप्पा तारेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काकती पोलिसांनी मनोहर लक्ष्मण होनगेकर, अरुण अप्पाजी जाधव, विवेक सुभाष गिरी, अनंत शंकर देसाई, संतोष गुंडू पाटील, गणपती शंकर पाटील, भास्कर कृष्णा कदम व राजेंद्र वसंत देसाई या सर्वाच्या विरोधात कलम १४३, १४७, १५३(अ) व सह कलम १४९ व कलम 3 KOPD Act 1951 व 1981 प्रमाणे गुन्हा नोंद केला होता.
या सर्वानी मिळून येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य फलक हटविल्यानंतर “महाराष्ट्र राज्य उचगांव” असा फलक तयार करून उचगांव बस स्टॉप व सरकारी केईबी खांब्यावर लावले त्यामुळे कन्नड व मराठी भाषिकांमध्ये वैर निर्माण करून तसेच शांतता भंग केला असा आरोप समितीच्या कार्यकर्त्यांवर केला, पोलीस अधिकारी श्री. आर. टी. लखमगौडर यांनी घटनेचा तपास करून चार्जशीट दाखल केली होती. चौथ्या जेएमएफसी न्यायालय समोर साक्ष नोंदवून सुद्धा या कार्यकर्त्यावरचा गुन्हा शाबीत करू शकले नाही म्हणून या सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
या सर्वाच्या वतीने ॲड. महेश बिर्जे, ॲड. एम . बी. बोंद्रे, ॲड. बाळासाहेब कागणकर व ॲड. वैभव कुट्रे यांनी काम पाहिले.
महाराष्ट्र राज्य उचगाव हा फलकच न्यायालयात काकती पोलिसांनी हजर केले नाहीत हि बाब ॲड. महेश बिर्जे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली, पोलिसांनी सदर फलकाचे फोटो न्यायालयासमोर हजर केले पण न्यायालयाने ते ग्राह्य धरले नाहीत.