
बेळगांव (वार्ता) : अलीकडे बेंगळुरू पाठोपाठ कर्नाटक राज्यात महिला आणि मुलांचे लैंगिक अत्याचार आणि विक्रीच्या अनेक घटनांमध्ये वाढ होत आहे. बेळगाव जिल्ह्याची सीमा महाराष्ट्र, गोव्याला लागून आहे. विक्रीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. हरवलेली मुले, लैंगिक अत्याचार, पीओसी कायद्यांतर्गत प्रकरणे, प्रेम प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. बेळगावात याला आळा घालण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत महिला कल्याणकारी संस्था, जिल्हा बाल संरक्षण युनिटच्या वतीने ‘उज्वला’ महिला पुर्नवसन केंद्र व बाल हेल्पलाइन केंद्रे कार्यरत आहेत. त्यानंतर आता अशा घटनांना आळा घालण्यासाठी शनिवारी (ता. १४) सकाळी ८ वाजता जथ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला आणि मुलांची तस्करी रोखण्यासाठी जवळपास ४० देशांनी एकाच वेळी जथ्याचे आयोजन केले आहे. त्यानुसार मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, गोवा, कोची, गुरुग्राम, हैदराबाद, शिलंगा, दिल्लीसह देशभरातील सुमारे १०७ ठिकाणी भव्य मूक पदयात्रा काढण्यात आली आहे.
शहरातील संघटना, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, एनसीसी, भारत सेवा दलाचे कार्यकर्ते, आणि अंगणवाडी सेविका, स्वयंसहाय्यता संस्थेचे सदस्य, युवक व युवती परिषद सदस्य आणि सर्व जागरूक नागरिकांनी या मूक आंदोलनात वेशभूषेसह सहभागी व्हावे, असे आवाहन मुव्हमेंट इंडिया मुंबई, ट्रॅलिटी मीडिया लिमिटेड, महिला कल्याण संस्था, बेळगाव यांनी केले आहे.
सरदार क्रीडांगण, चन्नम्मा सर्कल, काकतीवेस, गणपती गल्ली मारुती गल्ली, ध. संभाजी चौक, कॉलेज रोड येथून मोर्चा निघून सरदार मैदानावर समाप्त होईल.
Belgaum Varta Belgaum Varta