बेळगाव : दहा वर्षांपूर्वी देशातील जनतेला विविध आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने देशातील प्रत्येकाची फसवणूक केली आहे. जाती धर्माच्या नावावर देशात तेढ निर्माण करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशाचे संविधान बदलण्याचा घाट मोदी सरकारने घातला आहे. यावेळची लोकसभा निवडणूक स्वातंत्र संग्रामाची दुसरी वेळ ठरली आहे. यासाठी लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमताने विजयी करावे, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज बेळगावत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले.
यावेळी पुढे बोलताना सिद्धरामय म्हणाले, गेल्या आठ महिन्यांच्या काळात काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या पाच गॅरंटी योजनांची पुरेपूर अंमलबजावणी केली आहे. यामुळे राज्यातील जनतेचा काँग्रेस वरील विश्वास वाढला आहे. काँग्रेसला मिळत असलेल्या अभूतपूर्व जनविश्वासामुळे मोदी सरकार धास्तावले आहे. पराभवाच्या धास्तीमुळे हताश बनलेले पंतप्रधान मोदी खोटे बोलून जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. पंतप्रधान मोदींनी गेल्या दहा वर्षांच्या काळात नक्की कोणते ठोस कार्य केले याबाबत काहीच सांगत नाहीत.
जाती धर्माच्या नावावर समाजात तेढ निर्माण करण्याचे काम मोदी सरकार करत आहे.सर्वाधिक कर भरणाऱ्यांमध्ये कर्नाटक राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. मात्र केंद्राकडून देण्यात येणाऱ्या निधीमध्ये मोदी सरकार आमच्यावर अन्याय करत आहे.
भारतीय जनता पक्षाच्या सहा उमेदवारांनी संविधान बदलण्यात येणार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. भाजप नेते काँग्रेसच्या जनकल्याण हितकार योजना बंद करण्याच्या भाषा करत आहेत. भाजप सरकारला कष्टकरी, शेतकरी आणि गोर गरीब जनतेच्या समस्यांची कदर नाही. अंबानी आणि अदानींची हजारो कोटींची कर्ज माफ केली जात आहेत. मोदी सरकारने देशाचे विभाजन चालविले आहे. याकडे लक्ष दिल्यास लोकसभेची ही निवडणूक स्वातंत्र्यसंग्रामाचा दुसरा संघर्ष ठरणार आहे.याकडे लक्ष देऊन मतदारांनी काँग्रेसला भरघोस मतांनी विजयी करावे,असे आवाहन ही सिद्धरामय्या यांनी केले.