बेळगाव (वार्ता) : सध्या बेळगाव शहरात पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्या अनुषंगाने समाजसेविका माधुरी जाधव यांनी स्थानिक न्यूज चॅनलच्या माध्यमातून वडगाव भागातील नागरिकांच्या समस्या शासनाकडे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वॉर्ड क्रमांक 50 मधील आनंदनगर दुसरा क्रॉस येथील समिती कार्यकर्त्या शिवानी पाटील तसेच परिसरातील महिलांशी संपर्क साधून पाण्याच्या समस्येबाबत चर्चा करत असताना नवनिर्वाचित नगरसेविका सारिका पाटील आक्रमक होत शिवानी पाटील आणि माधुरी जाधव यांच्यावर अरेरावी केली आणि यापुढे या भागातील नागरी सुविधा थांबविल्या जातील अश्या प्रकारचे वक्तव्य देखील नगरसेविकेने केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. घडलेला प्रकार पाहता मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी माध्यमांद्वारे करणे हा देखील मराठी जनतेसाठी गुन्हा ठरतोय की काय अशी भीती व्यक्त होत आहे.
मागील 17 दिवसांपासून आनंदनगर भागात पाणी पुरवठा अनियमित आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अश्या परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी जनतेची सोय करणे अपेक्षित होते पण तसे न घडता लोकप्रतिनिधींच्या अरेरावीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
