बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा रविवार दि. 25 रोजी सकाळी 9.30 वा. संत मीरा शाळेच्या माधवाश्रम सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. हिंदी देशभक्तीगीत आणि लोकगीत (मराठी/कन्नड) अशा दोन विभागात स्पर्धा घेतली जाईल. स्पर्धेमध्ये अधिकाधिक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन भाविपने केले आहे.
स्पर्धेत ६ वी ते १२ वी चे विद्यार्थी भाग घेऊ शकतील. समूहात कमीतकमी ६ आणि जास्तीतजास्त ८ विद्यार्थी असावेत. वाद्य संगतीकरिता अधिक ३ सहकाऱ्यांना मुभा असेल. विद्युत संचलित वाद्यांना परवानगी नाही. समूहगायनासाठी अधिकतम ७ मिनिटांचा कालावधी असेल. परिषदेतर्फे प्रकाशित ‘चेतना के स्वर’ या पुस्तकातीलच हिंदी गीत असले पाहिजे. लोकगीत कोणतेही चालेल. संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे. संगीतरचना, शब्दोच्चार, स्वर, ताल आणि एकूण प्रभाव अशी गुणांची विभागणी असेल. प्रथम क्रमांक प्राप्त शाळासमूह प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरेल. प्रांतविजेता दक्षिण भारत विभागीय स्तर आणि विभागीय स्तर विजेता राष्ट्रीय पातळीवर समूह गायन स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करेल.
अधिक माहितीसाठी स्पर्धा संयोजिका रजनी गुर्जर ९७४३४४१८२८ अथवा योगिता हिरेमठ ९९६४४४८२८८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे भाविपचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी कळविले आहे.