जनतेचे आरोग्य धोक्यात
बेळगाव : बेळगाव शहरातील बॉक्साईट रोडवरील अन्नपूर्णा वाडी येथील रहिवासी भागातील जनतेला सांडपाणीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने येथील जनतेमध्ये संसर्गजन्य आजारांची भीती बळावली आहे.
बेळगावात स्मार्टसिटीची कामे जोरात सुरू आहेत. मात्र, या विकासादरम्यान होणाऱ्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एल अँड टी कंपनीच्या 24 तास पिण्याच्या पाण्याच्या कामामुळे अन्नपूर्णावाडी येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बेळगावच्या वैभवनगर आणि बॉक्साईट रोड अन्नपूर्णावाडी परिसरातील पक्क्या रस्त्याला चोवीस तास पाणीपुरवठा करणारी यंत्रणा बसवण्याचा चंग बांधला आहे. दरम्यान, ड्रेनेज पाईपला धक्का बसून ती फुटल्याने पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये सांडपाणी मिसळत आहे. येथील लोकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. ही बाब स्थानिकांनी नगर सेवक श्रेयस नाकडी यांच्या निदर्शनास आणून दिल्याने त्यांनी घटनास्थळी स्वतः थांबून काम सुरू केले. वैभवनगर आणि अन्नपूर्णावाडीतील लोकांना पुरवठा केलेले दूषित पाणी न पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आधीच शहरात साथीच्या रोगांची भीती वाढली आहे. अशातच ही परस्थिती उदभवल्याने लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.