बेळगाव : विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृतीची जोपासना केली पाहिजे. वाचनामुळे ज्ञानात भर पडते. ज्ञान ही एका दिवसात मिळण्याची शक्ती नाही. त्यासाठी दैनंदिन जीवनात वर्तमानपत्रे, चरित्रे, आत्मचरित्रे, कथा, कादंबरी याचे वाचन केले पाहिजे. सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडी आपल्याला समजतात, दृष्टिकोनाचा विस्तार होतो. त्यामुळे आपण निबंध, इतर विषयावर चांगले लेखन करू शकतो. व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. म्हणूनच वाचन हा विद्यार्थ्यांचा पाया जर भक्कम असेल तर स्पर्धा परीक्षेत निश्चित यश मिळेल. यासाठी मोबाईल पासून थोडे दूर होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी हसनेकर यांनी केले.
राज्य मराठी विकास संस्था मुंबई आणि छत्रपती शाहू प्रकाशन मंडळाचे साप्ताहिक राष्ट्रवीर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित भगतसिंग हायस्कूल आंबेवाडी येथे निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून हसनेकर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष शिवाजी अतिवाडकर होते. विचार मंचावर राष्ट्रवीर साप्ताहिकचे व्यवस्थापक शंकर कंग्राळकर, शाळा सदस्य समितीचे उपाध्यक्ष शिवाजी राक्षे, मल्लाप्पा सांबरेकर, गजानन घुग्रेटकर, मलेश लोहार, लक्ष्मीबाई कोवाडकर, मुख्याध्यापक एन. के. गुरव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली. स्वागत प्रभारी मुख्याध्यापक एन. के. गुरव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख माधुरी येलूरकर यांनी केले. सूत्रसंचालन जी. जी. पाटील यांनी केले. तर आभार क्रीडा शिक्षक जे. वाय. पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सुरेश पाटील यांनी प्रयत्न केले. निबंध स्पर्धेत विविध शाळातील 71 विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
Belgaum Varta Belgaum Varta