
बेळगाव : पाकिस्तानविरोधी कारवाईबाबत केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याला आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ, असे वक्तव्य बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी आज केले. केंद्राच्या आदेशानुसार राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना शोधून त्यांच्या देशात परत पाठवावे, असे निर्देश त्यांनी राज्य सरकारला दिले.
आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी बोलताना खासदार जगदीश शेट्टर म्हणाले, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मोदी सरकारने याबाबत तयारी सुरू केली असून, भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांनी बैठक घेतली आहे. केंद्र सरकार जे निर्णय घेईल, त्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. योग्य वेळी पाकिस्तानला पंतप्रधान मोदी कठोर उत्तर देतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, देशातील २४ जिल्ह्यांना युद्धसदृश स्थितीबाबत आधीच सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांचे रक्षण, पर्यावरण नियंत्रण, युद्ध कधी आणि कसे करावे यासंबंधी निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. सध्या सिंधू नदीचा प्रवाह रोखण्यात आला असून, जलविद्युत निर्मिती सुरू करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. यासोबतच आयात-निर्यात बंद करण्यात आली असून, केंद्र सरकारने परोक्ष युद्धाचे धोरण स्वीकारले आहे. याशिवाय केंद्र सरकारने सर्व राज्यांना आदेश दिले आहेत की त्यांच्या कार्यक्षेत्रातील पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना देशाबाहेर पाठवावे. कर्नाटक सरकारनेही हे आदेश पाळून पाकिस्तान प्रजांना शोधून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणी खासदार शेट्टर यांनी केली.
Belgaum Varta Belgaum Varta