
बेळगाव : बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेंतर्गत पाचव्या अग्निवीर तुकडीच्या प्रशिक्षणानंतर गेल्या ३१ आठवड्यांपासून लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या ६५९ अग्निवीर जवानांचा दीक्षांत संचलन सोहळा आज गुरुवारी पार पडला. यावेळी जवानांनी शानदार संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. तत्पूर्वी एमएलआयआरसी कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. अग्निवीर जवान गजानन राठोड यांच्या नेतृत्वाखालील जवानांच्या तुकडीने अत्यंत शिस्तबद्ध संचलन करून सर्वांचे लक्ष वेधले.

यानंतर राष्ट्रध्वज, रेजिमेंटल ध्वज आणि धर्मग्रंथांच्या साक्षीने अग्निवीर जवानांना शपथ देण्यात आली. या सोहळ्यात प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अग्निवीर जवानांना विविध पदके व पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी अग्निवीर यशवंत यांना उत्कृष्ट अग्निवीरचे व्हिक्टोरिया क्रॉस पदक प्रदान करण्यात आले. तसेच अग्निवीर तुकडीतील सर्वोकृष्ट कामगिरीबद्दल कॅप्टन कृष्णनाथ यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी म्हणाले की, एमएलआयआरआरसी हे सर्वात जुने प्रशिक्षण केंद्र आहे. ज्याने भारतीय लष्करी व्यवस्थेच्या इतिहासात विशेष भूमिका बजावली आहे. लष्करी प्रशिक्षण देण्यात स्वतःची भव्यता आणि समृद्धता असलेल्या या केंद्राने सैनिकांना तयार करण्यात विशेष भूमिका बजावली आहे. प्रशिक्षित अग्निवीर तुकडीच्या जवानांनी कोणत्याही संकोच न करता आणि धैर्याने आणि निष्ठेने देशाच्या सेवेत स्वतःला समर्पित करावे. शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीला विशेष प्राधान्य दिले पाहिजे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या कार्यक्रमाला एमएलआयआरसीचे वरिष्ठ अधिकारी, बेळगावातील मान्यवर, शाळकरी मुले आणि शूर जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta