
बेळगाव : महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या तारांगण संस्थेमार्फत पहिले बालकवी संमेलन मोठ्या उत्साहाने कॅन्टोन्मेंट मराठी शाळेत पार पडले. सरस्वती इन्फोटेक संचालिका सौ.ज्योती बामणे व पोमान्ना बेनके सदर कार्यक्रमाचे प्रायोजक होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष दै.पुढारीचे उप संपादक श्री. शिवाजी शिंदे, जेष्ठ साहित्यिक श्री. गुणवंत पाटील, पुणे येथील उद्योजक श्री. रविंद्र बिर्जे, अपटॅक एव्हिएशन संचालक श्री. विनोद बामणे, डाॅ. गोविंद मिसाळे, ऍडव्होकेट सुधीर चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रशांत बिर्जे, तारांगण संचालिका सौ. अरुणा गोजे पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पहिल्या बालकवी संमेलनाचे आयोजन करून मराठी साहित्य चळवळीतही तारांगण संस्था अग्रेसर आहे हे दिसून आले. प्रास्ताविक करताना त्या म्हणाल्या की बेळगाव परिसरातील बालकवींना संधी देण्यासाठी हे संमेलन आयोजित केले आहे. यातूनच उद्याचे भावी साहित्यिक घडतील अशी मला आशा आहे.महिला विद्यालय, मराठी विद्या निकेतन, मराठा मंडळ हायस्कूल, कॅन्टोन्मेंट मराठी स्कूल, यळळूर चांगळेश्वरी हायस्कूल, अशा विविध शाळांमधील जवळजवळ 50 विद्यार्थ्यांनी या संमेलनात सहभाग नोंदवला.
पहिलेच संमेलन असूनही अत्यंत उत्साहाने व यशस्वीपणे पार पडले. शेतकऱ्यांच्या व्यथा, बाप, आई, ध्येय, स्वप्न, पर्यावरण, राजकारण, सीमाप्रश्न, स्त्रीत्वाची महती, अशा कितीतरी विषयांवरील कविता विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सादर केल्या.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संमेलनाध्यक्ष शिवाजी शिंदे म्हणाले की साहित्यिकांचे जगणे आणि लिहिणे वेगळे नसते. जे अंतरंगात असते तेच साहित्यातून प्रकट होत असते.कसदार लेखन हवे असेल तर वाचन आणि अनुभव यांची सांगड घालता आली पाहिजे. विद्यार्थ्यांनी वाचनावर भर द्यावा. आपले अनुभव शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करावा.
जेष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील म्हणाले की, बेळगावची साहित्यिक भूमी कसदार आहे. अनेक साहित्यिकांनी आपल्या अनुभवांनी ती समृद्ध केली आहे. साहित्यिक परंपरा चालू ठेवली आहे.आता तोच वारसा आजचे बालकवी चालवणार आहेत. आजच्या बालकवींची प्रतिभा थक्क करणारी व मोठ्यांना लाजवणारी आहे.वि द्यार्थ्यांनी आपली साहित्यिक आवड अशीच जोपासावी.
सदर कार्यक्रमास प्रतिभा सडेकर, अस्मिता आळतेकर, अर्चना पाटील, सविता वेसणे, जयश्री दिवटे, नेत्रा मेणसे, कवी मधु पाटील, निळूभाऊ नार्वेकर, विश्वनाथ सव्वाशेरी, श्रेया सव्वाशेरी, आदी साहित्य रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी हुंदरे यांनी केले. आभार नेत्रा मेणसे यांनी मानले.

Belgaum Varta Belgaum Varta