

बेळगाव : “आपली संस्कृती टिकवायची असेल तर प्रथम भाषा टिकली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे. मुलांना आपली संस्कृती समजावून सांगितली पाहिजे. वाचनालयातील पुस्तके मुलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे” असे विचार आरपीडी महाविद्यालयाचे मराठी विषयाचे प्राध्यापक महादेव खोत यांनी बोलताना व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “अभिजात मराठी भाषा गौरव” सप्ताहातील दुसऱ्या दिवशी “मराठी भाषा आणि संस्कृती” या विषयावर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,” कोणतीही भाषा संपणार नाही, मात्र प्रत्येक भाषेला टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. संकटे ही छत्रपती शिवाजी महाराजांनाही आली होती पण ते कधी थांबले नाहीत. तशीच संकटे आपल्या भाषेला आणि अशा वाचनालयांना आली पण त्यांनी संकटे आणि संघर्ष यांना सामोरे गेल्यामुळेच ही वाचनालये शेकडो वर्ष टिकून आहेत.” असेही ते म्हणाले.
प्रारंभी वाचनालयाचे संचालक रघुनाथ बांडगी यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष अनंत लाड यांनी महादेव खोत यांचे स्वागत केले. कार्यवाह सुनीता मोहिते यांनी सूत्रसंचालन केले तर प्रसन्न हेरेकर यांनी आभार मानले. उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांच्यासह संचालक, कर्मचारी व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————————-
रविवारचा कार्यक्रम
सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी बाल शिवाजी वाचनालय, मच्छे चे माजी अध्यक्ष बजरंग धामनेकर यांचे “मराठी भाषेचा प्रवास” या विषयावर व्याख्यान होणार आहे. सर्वांनी या व्याख्यानास उपस्थित रहावे असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta