

बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या अडचणी कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत अध्यक्ष आर आर पाटील यांच्या राजीनाम्या नंतर कारखाना सुरू होण्यात अनिश्चितता दिसून येत आहे. अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष यांच्या नाराजीचा परिणाम थेट कारखान्याच्या कामकाजावर होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
मार्कंडेय साखर कारखाना सुरू नसल्याने बँकांचे कर्जही थकले आहे. बँकेसह गुंतवणूक केलेल्या पतसंस्थांनी परतफेडची मागणी केली आहे. बँकेकडून कर्जाच्या परतफेडसाठी प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी कारखान्याला मुदतही देण्यात आली आहे. तर पतसंस्थांनी कारखाना लिजवर न देता संचालक मंडळाच्या माध्यमातूनच गळीत हंगाम साधून गुंतवणुकीचा परतावा करावा असा तगादा लावला आहे. त्यामुळे अडचणींवर मात करण्यासाठी आर्थिक भक्कम पाठिंबा असलेल्या अध्यक्षांची कारखान्यावर निवड होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
विद्यमान अध्यक्ष आर आय पाटील यांनी दोन वेगवेगळे राजीनामा पत्रे सादर केले असून, त्यापैकी कोणते ग्राह्य धरावे यावर संचालक मंडळात एकमत झालेले नाही. राजीनामा दिल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत तो मागे घेता येतो. पाटील यांनी नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कोरम पूर्ण नसतानाच आपला राजीनामा मनोहर हुक्केरीकर यांच्याकडे सादर केला होता. मात्र त्या पत्रावर तारीख नव्हती. नंतर 13 ऑक्टोबर रोजी त्यांनी आणखीन एक राजीनामा पत्र दिल्याने त्यांना अद्याप आपला राजीनामा मागे घेण्याची संधी आहे.
Belgaum Varta Belgaum Varta