

बेळगाव : बेळगावला दुसरी राजधानी म्हणून घोषित करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. उत्तर कर्नाटक विकास वेदिकेने ही मागणी उचलून धरली असून लवकरात लवकर सुवर्णसौधच्या शेजारी प्रशासकीय इमारत उभारण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात यावा अन्यथा एक नोव्हेंबर रोजी थेट धरणे आंदोलन करण्याचा इशारा उत्तर कर्नाटक विकास वेदिकेने सरकारला दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना संघटनेचे अध्यक्ष बी. डी. हिरेमठ म्हणाले की, बेळगावला कर्नाटकाची दुसरी राजधानी म्हणून घोषित करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा सुवर्णसौधच्या बळकटीसाठी हा निर्णय घेणे आवश्यक आहे. सरकारने तातडीने हा निर्णय घ्यावा अन्यथा कर्नाटक विकास वेदिकेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल असे सांगत त्यांनी लोकप्रतिनिधींवर टीका देखील केली. लोकप्रतिनिधींनी जनहितासाठी काम केले असते तर आम्हाला अशा प्रकारे रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती असे देखील ते यावेळी मिळाले.
वेदिकेचे नेते अशोक पुजारी यांनी नेत्यांच्या इच्छाशक्तीवर व कार्यक्षमतेवर असमाधान व्यक्त केले. नेत्यांची इच्छाशक्ती नसल्यामुळे उत्तर कर्नाटकातील जनतेच्या अपेक्षांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. हिवाळी अधिवेशन म्हणजे केवळ औपचारिकता असून सरकार अधिवेशनाच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवते असे देखील ते यावेळी म्हणाले. तर भीमाप्पा गडाद यांनी अधिवेशनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. हिवाळी अधिवेशन म्हणजे औपचारिकता नसून या भागातील लोकांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्याचे काम सरकारकडून झाले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. उत्तर कर्नाटकात सुवर्ण सौध उभारल्याने या भागातील लोकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती मात्र याबाबत जनतेचा अपेक्षाभंग झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली व राज्यस्तरीय सचिव दर्जाची कार्यालय बेळगाव स्थलांतर करण्यासाठी विविध मठाधीशांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या लढ्याला प्रतिसाद न मिळाल्याचे देखील ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला गुरुराज हुणमराद, एस. बी. पाटील, विरुपाक्ष नीरलगीमठ यांच्यासह वेदिकेचे अनेक नेते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta