

बेळगाव : जय किसान भाजी मार्केटला कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने जोरदार दणका दिला असून जय किसान भाजी मार्केटच्या दाखल करण्यात आलेल्या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या आहेत.
बेळगाव सरकारी कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी भाजी मार्केट) आणि जय किसान खाजगी भाजीपाला मार्केट यांच्यात मागील काही महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. जय किसान भाजी मार्केट येथील व्यापाऱ्यांनी त्यांचा व्यापारी परवाना रद्द करण्याच्या त्याचप्रमाणे भाजीपाला व्यापाऱ्यांना एपीएमसी मार्केटमध्ये हलविण्याच्या कृषी खात्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यांची ही अचिका धारवाडच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे त्यामुळे जय किसान भाजी मार्केटला मोठा दणका दिला आहे. धारवाड खंडपीठाने 25 ऑक्टोंबर रोजी केलेल्या सुनावणीनंतर आज ही याचिका फेटाळून लावली आहे त्यामुळे कृषी पणन विभाग आणि सरकारी कृषी उत्पन्न बाजार समिती यांची कारवाई पूर्णपणे वैध ठरली आहे. धारवाड खंडपीठाचा हा निर्णय म्हणजे व्यापारी शेतकरी तसेच सामान्य नागरिकांसाठी विजय मानला जात असून एपीएमसी कायदा अंतर्गत पारदर्शक व्यापार करणे योग्य असल्याचे न्यायालयाच्या निकालाने स्पष्ट केले आहे व बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या खाजगी जय किसान भाजी मार्केट कायदेशीररित्या अपात्र ठरला आहे. जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी भू वापर परवाना रद्द बाबत आव्हानात्मक याचिका दाखल केली असून या याचिकेवर तीन नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर शेतकरी आणि व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे
Belgaum Varta Belgaum Varta