
बेळगाव : उसाला प्रतिटन 3,500 रुपये इतका आधारभूत दर मिळेपर्यंत सुरू असलेल्या लढ्याला आपला संपूर्ण पाठिंबा राहील, असे भारतीय कृषक समाजाचे अध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी स्पष्ट केले.
आज बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी साखर कारखान्यांवर टीका करताना म्हटले की, ऊस नियंत्रण मंडळासाठी बनवलेले कायदे हे ‘दात नसलेल्या सापासारखे’ आहेत. हजारो कोटींचा नफा कमावणारे साखर कारखाने उसासाठी आधारभूत दर देण्यास तयार नसणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. प्रति टन उसासाठी कापणी आणि वाहतूक खर्चाव्यतिरिक्त, पहिला हप्ता 3,500 रुपये निश्चित करण्यात आला आहे, आणि यावर शेतकरी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाहीत. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून, उर्वरित ऊस पिकाबाबत जिल्हा प्रशासन ‘सौदेबाजी’ करत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माजी मंत्री शशिकांत नाईक यांनी सांगितले की, उत्तर कर्नाटकातील विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन हे आंदोलन करत आहेत आणि याला सर्वांचा पाठिंबा आहे. त्यांनी प्रति टन उसासाठी 3,500 रुपये आधारभूत दर देण्याची मागणी रेटून धरली. या प्रसंगी काळसा-भांडुरा, बागलकोट शेतकरी संघ आणि इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta