
बेळगाव : कारवारप्रमाणेच बेळगाव जिल्ह्याचे देखील संपूर्ण कानडीकरण करण्याचा कुटील डाव कर्नाटक प्रशासनाने घातला असून सरकारने बेळगाव ग्रामीण व खानापूर तालुक्यातील शंभर टक्के मराठी भाषिक गावांमध्ये मराठी शाळांच्या इमारतीत कन्नड शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षण खात्याने दिले असून आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
मराठी गावांमध्ये कन्नड शाळा सुरू करून पालकांची मानसिकता बदलून पुढील पिढीचे कानडीकरण करण्याचा कुटील डाव कर्नाटक सरकार करीत असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव तालुक्यातील सावगाव, बाची गावामध्ये मराठी शाळेच्या इमारतीतच कन्नड शाळा सुरू करण्यात येणार आहे तर खानापूर तालुक्यातील काटगाळी, बिदरभावी, राजवाळ-गवळीवाडा, हणबरवाडा आणि शिरोली वाडा या मराठी गावांमध्ये देखील अशाच प्रकारे कन्नड शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे मराठी भाषिका संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे शिक्षण खाते मराठी शाळांची दुरावस्था झालेली असताना त्याकडे दुर्लक्ष करते पण संख्या घटल्याचे कारण देऊन मराठी शाळातील शिक्षकांची नियुक्ती रोखणे, शाळा स्थलांतरित करणे अशा प्रकारचे धोरण राबवत असते तर दुसरीकडे एखाद दुसऱ्या कुटुंबाच्या मागणीवरून कन्नड शाळा सुरू करून प्रशासन मराठी भाषा व मराठी शाळांचे अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारच्या या धोरणामुळे मराठी भाषिकांतून तीव्र रोष निर्माण झाला आहे. सरकारच्या या धोरणाच्या विरोधात मराठी संघ संस्था तसेच महाराष्ट्र एकीकरण समिती काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्यातील मराठी भाषिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta