
बेळगाव : ग्रामीण भारताची जीवनवाहिनी असलेल्या ‘मनरेगा’ योजनेत बदल करून महात्मा गांधीजींचे नाव हटवण्याच्या आणि ‘व्हीबी-जी रामजी’ विधेयक लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सोमवारी भारतीय कृषक समाजातर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली.
केंद्र सरकारने हिवाळी अधिवेशनात ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’त सुधारणा करणारे विधेयक आणले आहे. भारतीय कृषक समाज (संयुक्त) आणि नरेगा सहभाग संघटनेने याला जोरदार विरोध दर्शवला आहे. बदलांच्या नावाखाली केंद्र सरकार ग्रामीण भागातील या महत्त्वाच्या योजनेला गुंतागुंतीचे करून ती बंद करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी म्हणाले की, “ग्रामीण भागातील गरीब आणि शेतमजुरांसाठी वरदान ठरलेल्या या योजनेतून महात्मा गांधीजींचे नाव बदलणे खेदजनक आहे. हा केवळ नामंतराचा विषय नसून रोजगाराचा हक्क हिरावून घेण्याचे हे षडयंत्र आहे.” केंद्र सरकारने पुन्हा या योजनेचे नाव ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ असेच ठेवावे आणि मजुरांचे वेतन व कामाचे दिवस वाढवून त्यांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी कार्यकर्ते आणि नरेगा संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta