

बेळगाव : बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता करण्याचा प्रकार सध्या बेळगावसह परिसरात जोरात सुरू आहे. भू माफिया संबंधित खात्यातील अधिकाऱ्याला हाताशी धरून बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी हडप करत असून बेळगाव जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाच्या सदस्यांची पिढीजात मालमत्ता बनावट कागदपत्राद्वारे हडप करण्याचा प्रकार सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जमीन मालक, मालमत्ता व ब्राह्मण कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टच्या वतीने सदर निवेदन बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना आज बुधवारी देण्यात आले. निवेदनाचा स्वीकार जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी करून संबंधित खात्याकडून माहिती घेऊन तात्काळ योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन ब्राह्मण समाज ट्रस्टला दिले. बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ब्राह्मण समाजाची मालमत्ता आहे. या मालमत्तांवर बेकायदेशीररित्याचा अहवाल मिळविण्याचा प्रयत्न, त्यासाठी लागणारे कागदपत्रे तयार करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित मालमत्ता ही ब्राह्मण कुटुंबीयांची केवळ आर्थिक संपत्ती नसून पिढ्यानपिढ्या जपलेली परंपरा सन्मान आणि उपजीविकेचे साधन आहे. बेळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी उपनोंदणी कार्यालयांमध्ये खोट्या स्वाक्षऱ्या करून बनावट कागदपत्रे तयार करणे, मृत व्यक्तींना जिवंत दाखविणे त्याचप्रमाणे बनावट वारसा निर्माण करणे यासारख्या गंभीर गैरप्रकारांच्या तक्रारी वाढत आहेत. या प्रकारातून कोट्यावधी रुपयांची मालमत्ता हस्तांतरित करण्यात येत आहे. काही प्रकारणामध्ये मूळ मालकांच्या नोंदी लपवून त्याऐवजी बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदेशीर जमीन व्यवहार करणारी भूमाफियांची टोळी बेळगाव जिल्ह्यात सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. या विरोधात आवाज उठवणाऱ्या ब्राह्मण कुटुंबीयांना या भूमाफियांकडून धमक्या दिल्या जात असून ही बाब चिंताजनक असून निंदनीय आहे. शासनाने याबाबत वेळीच लक्ष घालून उपनोंदणी कार्यालयातील अनियमित तिची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावे. मृत व्यक्तींना जिवंत दाखवणाऱ्या बनावट नोंदी करणाऱ्या सर्व संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी आणि ब्राह्मण समाजाला न्याय आणि संरक्षण मिळवून देण्यात यावे. अशा आशयाचा तपशील बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आला आहे. निवेदन सादर केल्यानंतर ब्राह्मण समाज ट्रस्टच्या वतीने भारत देशपांडे यांनी बोलताना सांगितले की, अलीकडच्या काळात ब्राह्मण लोकांच्या पिढीचा जमिनी बनावट कागदपत्र तयार करून हडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तेव्हा प्रशासनाने जातीने लक्ष घालून ब्राह्मण समाजाला संरक्षण मिळवून देण्यात यावे अशा आशयाची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी ट्रस्टचे सदस्य आणि ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Belgaum Varta Belgaum Varta