Sunday , September 8 2024
Breaking News

कर्नाटक मायग्रेशन देईना अन् महाराष्ट्र परीक्षेला बसू देईना!

Spread the love

प्रा. राजन चिकोडे यांचे पत्रक : सीमाभागातील विद्यार्थ्यांची कुचंबना
निपाणी : शिक्षणासाठी परराज्यातून येणार्‍या विद्यार्थ्यांना स्थलांतर (मायग्रेशन) दाखला देणे बंधनकारक आहे. सीमाभागातील बहुसंख्य विद्यार्थी 10 वी नंतर महाराष्ट्र राज्यात शिक्षणासाठी जातात. पण स्थलांतर दाखला कधीच वेळत मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्व दाखले वेळत देऊन शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी माजी सभापती प्रा. राजन चिकोडे निपाणी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
नांगनूर येथील सिध्दोजीराजे आर्टस, सायन्स, कॉमर्स पी.यु. कॉलेजचा विद्यार्थी ओमकार विलास चव्हाण हा 11 वी उत्तीर्ण होऊन 12 वी वर्गासाठी सन् 2020- 21 या शैक्षणिक वर्षासाठी कोल्हापूरमधील नाइट कॉलेज ऑफ आर्टस अ‍ॅन्ड कॉमर्स येथे प्रवेश घेतला. त्याने कर्नाटक पीयुसी बोर्ड बेंगलोर यांच्याकडे 22 डिसेंबर 2020 रोजी रजिस्टर पत्राद्वारे रितसर अर्ज स्थलांतर दाखला मिळवण्यासाठी केला आहे.
त्याला सात महिने उलटली तरी दाखला अद्याप बेपत्ताच आहे. परिणामी ओमकारला 12 वी परीक्षा फार्म भरता आला नाही.
कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने 12 वी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अजूनही सवलत दिली आहे. या संधीचा फायदा वेळेत दाखला मिळाला तरच होणार आहे. ओंकारसारख्या अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही.
कांही वर्षापूर्वी स्थलांतर दाखला समस्या बारावी बोर्ड परिक्षासाठी अर्जुननगर केंद्र निपाणीतील नाइट कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व निपाणीचे तत्कालीन आमदार काकासाहेब पाटील यांनी याप्रश्नी जातीने लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला होता. आजही स्थलांतर दाखला अभावी शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची संबंधित प्रशासनाने दखल घेतली पाहिजे. स्थलांतर दाखला नाही म्हणून परीक्षा फार्म भरणेचा विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेणे योग्य नाही. हे विद्यार्थी भारतातीलच आहेत. ते परदेशातील नाहीत. तेव्हा संबंधित विभागाने सर्व विद्यार्थ्यांना त्वरीत दाखले पाठवावेत. तसेच महाराष्ट्र शासनाने ही सीमाभागातील विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून फॉर्म भरणेस परवानगी द्यावी, असे ही पत्रकात प्रा. राजन चिकोडे यांनी नमुद केलेले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *