बेळगाव : सोमवारी सकाळी शेतकरी संघटनेची बैठक समर्थ नगर येथील पाटील राईस मिल येथे संपन्न झाली. यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चांगले पक्के रस्ते मिळावेत, रस्त्यांवरील उगवलेले रान व चिखल काढून रस्त्याचे मजबुतीकरण करावे असे सर्वानुमते सुचविण्यात आले.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याकरिता आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत, तरी काही शेतकऱ्यांना या नुकसान भरपाई संदर्भात माहिती नसल्याने अजूनही वेळ गेली नाही तरी शेतकऱ्यांनी येत्या 10 जुलै पर्यंत आपली कागदपत्रे आमच्या शेतकरी कार्यालयात जमा करावी, शेतकऱ्यांच्या रस्ते संदर्भात आम्ही आमदार अनिल बेनके यांना मंगळवारी सकाळी भेट घेणार आहोत असे सांगितले.
यानंतर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील जाधव म्हणाले, शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने शेतीचे अवजारे, ट्रॅक्टर विविध यंत्रसामग्री ने-आण करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. बहुतांश ठिकाणी केवळ रस्ता नाही म्हणून पिके घेता येत नाहीत ही अडचण लक्षात घेऊन शासनाने शेत रस्ते योजना लवकरात लवकर सुरू करावे. तसेच भाजी मार्केटच्या बाजूचा सोमनाथ नगर ते बळारी नालापर्यंत शेतीरस्ता व हरिकाका कंपाउंड येथील रस्तासाठी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आमदार अनिल बेनके यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना असे आदेश दिले. पण मनपा प्रशासनाकडून या आदेशाकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसते. गेल्या सहा महिन्यात आमदारांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले, पण एकाही रस्त्याची दुरुस्ती व मजबुतीकरण झालेच नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासनाने योजना आखली, पण जिल्हा प्रशासनास योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सवडच नसल्याचे दिसते.
शेतमाल बाजारात पोहचविण्यासाठी व यंत्रासामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची गरज आहे. शेतरस्ते हे रस्ते महानगरपालिकेच्या योजनांमध्ये येत नसल्याने विविध स्त्रोतामधून निधीच्या उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होतात. पावसाळ्यात शेतीमध्ये पेरणी, मळणी, कापणी व इतर कामे यंत्रामार्फत केली जातात. या यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यासाठी शेतातील रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे
यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, तालुकाध्यक्ष सुनील जाधव, सुनील खनुकर, निळकंठ चौगुले, गडगप्पा हंडीगळ, महेश बंडमाजी, चंद्रकांत चौगुले, महेश हंडीगळ, यल्लाप्पा जिनगौडा, अनंत चौगुले, रमेश उसुलकर, राजू पावले, लक्ष्मण मन्नोळकर, यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.