
बेळगाव : राष्ट्रीय पक्षांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वत्र बंडखोरीचे सत्र सुरु झाले असून बेळगावसह संपूर्ण राज्यभरात हि विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. बेळगावमधील चारही मतदार संघात ‘टफ फाईट’ देण्यास भाग पाडणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांची धास्ती राष्ट्रीय पक्षांनी घेतली असून आज खानापूर मतदार संघाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सकाळी १०.३० वाजता गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले, तिथून महापुरूषांना हार अर्पण केले. बाबासाहेब आंबेडकर, बसवेश्वर, वाल्मिकी मंदिर व नंतर चौराशी मंदिरला जाऊन पूजा करून देवीचे दर्शन घेतले व तिथून पुढे पदयात्रा सुरू झाली. वाटेत टिपू सुलतान चौकातून पुढे, छत्रपती संभाजी महाराजांना पुतळ्यास हार अर्पण करून पुढे रवळनाथ मंदीर, ज्ञानेश्वर मंदिरात दर्शन घेऊन लक्ष्मी मंदीर व मारूती मंदिरात दर्शन घेऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण केला, महाराजांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
खानापूर येथी शिवस्मारकाला अभिवादन करून शेकडो समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत, वाद्यवृंदाच्या ठेक्यावर, चौराशी देवस्थानापासून रॅलीच्या माध्यमातून अंजली निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
काँग्रेस पक्षाच्या झेंड्यासह भगवे झेंडे हाती घेतलेल्या समर्थकांनीही मिरवणुकीत सहभाग घेऊन पाठिंबा दर्शविला आहे.
खानापूर मतदार संघात भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या तिरंगी लढत होणार आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस मधून निवडणूक लढवून विजयी ठरलेल्या आमदार अंजली निंबाळकर यांना काँग्रेसने पुन्हा एक संधी दिली असून या निवडणुकीसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta