खानापूर : तालुक्यातील गोधोळी गावाच्या हद्दीत धारवाड रामनगर राज्य महामार्गावर शेतात जाणाऱ्या चार शेतकऱ्यांवर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोन शेतकरी जागीच ठार तर एकाचा केएलई मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
गोधोळीचे चार शेतकरी त्यांच्या शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी जात होते. गावाच्या शिवारात पायी चालत शेताकडे जात असताना मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला, एक गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी झाला.
अपघाताचे वृत्त समजताच माजी आमदार अरविंद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमींना व मृतदेहांना रुग्णालयात दाखल केले. त्यांनी खानापूर शासकीय रुग्णालयात जाऊन मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात मदत केली.
महाबळेश्वर शिंदे (वय 65) आणि गोधोली गावातील पुंडलीक रेडेकर (वय 72) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. पुंडलिकचा मोठा भाऊ कृष्णा रेडेकर (74) हे गंभीर जखमी झाले होते. त्याच्यावर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. अन्य जखमी मंजुनाथ कागीनाक (47) यांना किरकोळ दुखापत झाल्याने ते बचावले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नंदगड स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta