
खानापूर : खानापूर तालुका हा धुवाधार पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. जुन महिना पावसाविनाच गेला जुलै महिन्याचे पंधरा दिवस गेले तरी पावसाने जोर केला नाही.
गेल्या दोन दिवसांपासून म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी खानापूर तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासात पावसाची नोंद झाली असुन कणकुंबीत ७७.६ मी मि. सर्वात जास्त पावसाची नोंद झाली असुन तालुक्याच्या लोंढा, गुंजी, अमगाव, पारवाड, कणकुंबी, तसेच शिरोली वाडा आदी जंगलभागात सतत पडणाऱ्या पावसामुळे विद्युत खांब कोसळून पडले आहेत. तसेच विद्युत तारा तुटून पडल्या आहेत.
त्यामुळे खानापूर हेस्काॅम खात्याचे प्रचंड नुकसान झाले असुन वीज खांब कोसळल्याने, विद्युत तारा तुटल्याने या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
मंगळवारी दि. १८ रोजी सकाळी लोंढा गावात विद्युत खांब कोसळून पडला. घटनेची माहिती मिळताच खानापूर हेस्काॅम खात्याच्या कार्यकारी अभियंत्या सौ. कल्पना तिरवीर यांनी कर्मचारी वर्गासह घटनास्थळी धाव घेऊन नुकसानीची पाहणी केली. व लागलीच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. तालुक्याच्या घनदाट जंगलात रस्त्याची व्यवस्था नसताना वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न सुरू आहेत. नविन विद्युत खांब उभे करून, विद्युत तारा दुरूस्त करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दोन दिवसाचा तरी कालावधी लागणार आहे. तेव्हा या भागातील नागरिकांना वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन खानापूर हेस्काॅम खात्याच्या कार्यकारी अभियंत्या सौ कल्पना तिरवीर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta